दोन्ही ठाकरे एकत्र आले तर ताकद किती वाढणार? कुणाला किती टक्के मते मिळालेली आहेत? वाचा…
GH News June 17, 2025 08:07 PM

राज्याच्या राजकारणात सध्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या युतीची चर्चा आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छाही दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास महाराष्ट्राला फायदा होईल असं विधान अनेकांनी केलं आहे. आज आपण हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही पक्षांची ताकद किती वाढेल? या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा का सुरु झाली?

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांनी मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना राज यांनी, ‘एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत’ असे विधान केले होते. तेव्हापासून या युतीची चर्चा सुरु झाली.

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना, मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे, महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं म्हटलं होतं. त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटीगाठीही झाल्या. मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही.

मतांचे आकडेवारी काय आहे?

गेल्या काही निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची कामगिरी खराब झाल्याचे दिसत आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 95 जागांवर उमेदवार उभे केले होते यातील 20 जागा जिंकण्यात पक्षाला यश आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10 टक्के मते मिळाली होती. तर राज ठाकरे मनसेने 125 जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही आणि पक्षाला 1.6 टक्के मते मिळाली होती.

मनसेचे दमदार पदार्पण, मात्र…

राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्मान सेना या पक्षाने 2009 च्या विधानसभा निवडणुकीतून पदार्पण केले होते. पहिल्याच या निवडणुकीत पक्षाला 13 जागा मिळाल्या होत्या. तसेच पक्षाला 5.7 टक्के मते मिळाली होती. याच निवडणुकीत शिवसेनेने 16.3 टक्के मतांसह 44 जागा जिंकल्या होत्या.

2009 नंतर राज ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी घसरली असल्याचे दिसत आहे. 2014 च्या महाराष्ट्र निवडणुकीत मनसेने 219 जागा लढल्या मात्र पक्षाला केवळ एक जागा मिळाली आणि मतांची टक्केवारीही 3.2 टक्क्यांपर्यंत घसरली. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही मनसेला 2.3 टक्के मिळाली होती, आणि पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला होता.

वरील सर्व आकडेवारी पाहिल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडणार नसल्याचे दिसत आहे. मात्र दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जे उमेदवारांचा कमी फरकाने पराभव झाला होता, तिथे विजय मिळू शकतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.