आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणं हा कोणत्याही फलंदाजाच्या खेळीतील महत्त्वाचा टप्पा असतो. शतक केल्यानंतर त्या फलंदाजाला आणि त्याच्या संघाला आनंद होणे ही सहाजिकच गोष्ट आहे.
त्यामुळे शतक साजरं करताना अनेक फलंदाज अनोख्या गोष्टीही करत असतात. जसं की काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२५ मध्ये रिषभ पंतने शतक केल्यानंतर कोलांटी उडी मारली होती. पण कधीकधी अनोख्या सेलीब्रेशन करण्याच्या नादात काहीतरी भलतंच होऊ शकतं. कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शान्तोच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे.
मंगळवारपासून (१७ जून) श्रीलंका आणि बांग्लादेश संघात कसोटी मालिकेला सुरूवात झाली असून गॉलमध्ये पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्याच सामन्यात बांगलादेशच्या शान्तो आणि मुशफिकूर रहिम यांनी पहिला दिवस त्यांच्या फलंदाजीने गाजवला. दोघांनीही पहिल्याच दिवशी शतके साजरी केली.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. पण पहिल्या तीन विकेट्स १७ षटकांच्या आतच ४५ धावांत गमावल्या. मात्र त्यानंतर शान्तो आणि रहिम यांनी दिवस संपेपर्यंत विकेट जाऊ दिली नाही. या दोघांनीही शतके करताना दिवस संपेपर्यंत नाबाद २४७ धावांची भागीदारी केली. ज्यावेळी शान्तोने त्याचे शतक केले, त्यावेळी त्याचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला.
झाले असे की ७४ व्या षटकात प्रभात जयसूर्या गोलंदाजी करत होता. त्याच्या पाचव्या चेंडूवर शान्तोने फाईन लेगच्या दिशेने स्वीप मारला आणि दोन धावा घेतल्या. या दोन धावा घेताच त्याचे शतक पूर्ण झाले. शतक पूर्ण करताच त्याने आनंदाने पळत येत मोठी उडी मारली.
पण त्याचवेळी डीपवरून त्याच्यादिशेने जोरात चेंडू आला. ते पाहून उत्साहात असलेल्या शान्तोला चेंडूपासून वाचण्यासाठी पुन्हा उडी मारावी लागली. त्यामुळे त्याच्या सेलिब्रशनमध्ये व्यत्यय आला आणि त्याचे सेलिब्रेशन पूर्ण होऊ शकले नाही. या घटनेचा सध्या व्हायरल होत आहे.
या सामन्यात पहिल्या दिवस अखेर शान्तो २६० चेंडूत १३६ धावा करून नाबाद आहे. त्याने १४ चौकार आणि १ षटकार मारला. तसेच मुशफिकूर रहिमने १८६ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद १०५ धावा केल्या. बांगलादेशच्या ९० षटकात ३ बाद २९२ धावा झाल्या आहेत. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना थरिंदू रत्नानायकेने २ विकेट्स घेतल्या.