बदलापूर : बदलापुरात वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढत असताना, शहरातील बेशिस्त वाहनचालकांकडून बेकायदा गाड्या पार्किंग केल्या जात आहेत. यामुळे या गाड्या वळणावरच पार्किंग केल्या जात असून, बाहेर येताना एका बाजूच्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताची भीती येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
त सध्या वाहतूक कोंडी आणि बेकायदा पार्किंग ही समस्या मोठी होत जात आहे. त्यात या दोन्ही समस्या एकमेकांशी संलग्न असल्याने या दोन्ही समस्यांचा त्रास वाहनचालक, पायी चालणाऱ्या सगळ्याच नागरिकांना होत आहे. मुख्य म्हणजे कात्रप गणेश घाट परिसरात मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला आत मोठी रहिवाशी संकुले आहेत.
या रहिवाशी संकुलाच्या मधून जाणारा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडलेला आहे. त्यामुळे घरातून निघताना, वाहन घेऊन जाताना मुख्य रस्त्यावर येऊन उजवीकडून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेता येत नाही. कारण, या उजवीकडील भागात संपूर्ण रस्त्यावर मोठमोठ्या खाजगी बस, शाळेच्या बस बेकायदा उभ्या केल्या जातात.
त्यामुळे मुख्य रस्त्यावरील उजवीकडून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने, एखादा मोठा अपघात घडण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत. मोठमोठ्या या गाड्यांमुळे पूर्ण रस्ता झाकला जातो आणि मुख्य रस्त्यांवर गाड्या दिसत नसल्याने, वाहनचालक पायी चालणाऱ्या लोकांचा अंदाज पण चुकतो.
त्यामुळे या ठिकाणी कोणताही अपघात घडण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी या बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत बदलापूर वाहतूक पोलीस किरण जिरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, संबंधित रहिवाशांची अशी तक्रार असेल तर, त्या संबंधी पत्र प्राप्त झाल्यावर या बसेस वर ठोस कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
सकाळच्या वेळेत मुलीला शाळेत सोडायला जाताना, संकुलाच्या बाहेर गाडी नेऊन, मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी उजवीकडून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेण्यात या बेकायदा पार्क केलेल्या गाड्यांमुळे मोठा अडसर येतो. आधीच सकाळी झोपेतून उठून शाळेची वेळ गाठण्याची घाई त्यात हा अडसर यामुळे अशा वेळेत एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर ताबडतोब कारवाई करावी.
- गणेश गायकवाड, रहिवासी