मुंबई - गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे. तब्बल १२ हजार ५०० कोटी रुपयांचा तोटा असल्याचा एकूण अंदाज आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून पैसे देण्यास मिळणारी दीड महिन्यांची मुदत बंद करण्यात आली आहे.
या आर्थिक परिस्थितीमुळे एसटीला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, गाड्यांच्या इंधनासाठी सरकारकडे मदत मागावी लागते. त्यातच गाड्यांसाठी दिवसाला दहा लाख लिटर डिझेल व वर्षाला ३६०० कोटींचे डिझेल लागणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती खालावली आहे.
‘आगाराच्या एकूण तिकीट महसुलापैकी ४५ टक्के रक्कम विविध सामाजिक सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून सरकारकडून पुढील दीड महिन्यानंतर उपलब्ध होते. ५५ टक्के तिकीट महसुलापैकी दहा टक्के महसूल ऑनलाइन तिकीट विक्री व आगाऊ आरक्षण स्वरूपात एसटीच्या मध्यवर्ती खात्यात जमा होते.
४५ टक्के रोख रक्कम आगाराच्या खर्चासाठी उरते,’ असे एसटी अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.
‘लालपरी’ गोत्यात
गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे
कोरोनाकाळात वाहतूक बंद असल्याने मार्च २०२० ते मार्च २०२२ या काळात एसटीचे सहा हजार ३०० कोटींचे उत्पन्न बुडाले
कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते
नव्या गाड्यांची खरेदी करता येत नाही आणि जुन्या गाड्यांवर ताण येतो
गाड्यांची देखभाल वेळच्यावेळी करता येत नाही
पैसे नाहीत म्हणून नवीन भरती करता येत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांवर ताण येतो
अनेक स्थानके, आगार यांची दुर्दशा