राशीन : तहसीलदार गुरू बिराजदार यांनी राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जातीने उपस्थित राहत पालक अन् शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
उन्हाळ्याच्या सुटीनंतर सोमवारी (ता.१६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पहिली घंटा वाजली, शाळेत पहिल्या दिवसी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत सडा-रांगोळ्या टाकून स्वागत करण्यात आले. निरागस, गोंडस, काही हसतमुख, तर काही रडवलेले चेहरे घेऊन शिक्षणाच्या श्री गणेशासाठी आलेल्या चिमुरड्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके व खाऊ देऊन तहसीलदार बिराजदार यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व पालकांसोबत संवाद साधला.
नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारी नियोजन करण्यात आले. शासनाकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल साळवे, अमोल जाधव, किशोर कांबळे, मुख्याध्यापक अजय सोनवणे, बापूराव वावगे, रमेश मासाळ, रावसाहेब ढवळे, गणेश पंडित, संतोष मुसळे, भास्कर घोडके, किशोर कदम, प्रदीप कोकाटे, स्मिता गुणवरे, तृप्ती भापकर, उज्ज्वला पंडित, शुभदा देशमुख, शुभांगी भालेराव यांच्यासह सर्वउपस्थित होते.
शाळांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. शाळेची पहिल्यांदा पायरी चढणारे शाळेच्या आवारात हंबरडा फोडत होते. शिक्षक त्यांना प्रेमाने समजावत होते. पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारी भोजन देण्यात आले.