Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी७ शिखर परिषदेत सहभागी झाले असून परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, व्यापार आणि विकासाच्या मुद्द्यावर जगभरातील नेत्यांशी संवाद साधला. कॅनडाच्यचा कनानस्किसमध्ये जी७ परिषदेचं आय़ोजन करण्यात आलंय. या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील कठोर धोरणाचा पुनरुच्चार केला. दहशतवाद हा जागतिक धोका असून त्याच्याविरोधात एकत्र येऊन कारवाईची गरज असल्याचं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जागतिक शांती आणि समृद्धीसाठी आपल्या विचार आणि धोरणांमध्ये स्पष्टता असायला हवी. एखादा देश जर दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्या देशाला किंमत मोजावी लागेल. आंतरराष्ट्रीय समुदायात कारवाईत दुटप्पीपणा असू नये असंही मोदींनी म्हटलं.
एका बाजूला आपण आपल्या पद्धतीने वेगळ्या प्रकारच्या बंदी तातडीने घालतो. तर दुसऱ्या बाजूला काही देश उघडपणे दहशतवादाचं समर्थन करतात. त्यांना पाठिंबा देतात हे दुहेरी धोरण बंद व्हायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावर माहिती देताना म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारताची भूमिका पुन्हा सांगितली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेत्यांचं आभार मानलं. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्यांविरोधात जागतिक पातळीवर कारवाईची आवश्यकता असल्याचं सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संबोधनात ग्लोबल साउथच्या चिंता आणि प्राधान्य यावरही लक्ष देण्याचं आवाहन केलं. भारत ग्लोबल साउथच्या आवाजाला जागतिक व्यासपीठावर पोहोचवणं ही आपली जबाबदारी समजतो. आर्थिकदृष्या विकसीत नसलेल्या देशांच्या संदर्भात ग्लोबल साउथ हा शब्द वापरला जातो.