ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
esakal June 18, 2025 10:45 PM

तारापूर, ता. १८ (बातमीदार) : बोईसर पूर्वेकडील गावांमध्ये महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून नागरिक संतप्त झाले आहेत.
महावितरणच्या बोईसर उपविभागांतर्गत पूर्वेकडील गुंदले, कुकडे, महागाव, शिगाव, गारगाव, लालोंडे, नागझरी, किराट, बोरशेती, रावते, चिंचारे या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. मे महिन्यातील पावसाने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत खांब जमीनदोस्त झाले असून, वीजवाहक तारा तुटल्या आहेत. यामुळे या परिसरात दोन ते तीन दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, दुरुस्तीनंतरही रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरूच असून महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी सातत्याने वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. तुरळक पावसातही वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात येत नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होत असून व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजना करूनही दरवर्षी विजेची समस्या कायम राहत असल्याने नागरिक वैतागले आहेत.

बोईसर पूर्व परिसरात मे महिन्यातील पावसाने विजेचे खांब, विद्युत तारा आणि रोहित्रे यांचे मोठे नुकसान झाले होते. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अथक प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.
- नरेंद्र संगेपू, उपविभागीय अभियंता, महावितरण बोईसर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.