मुंबई - पहिलीपासून हिंदीच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविले. राज्यातील मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न असून तो शिक्षकांनीच हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी या पत्रात केले आहे.
राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे, की यात मुलांसोबत मराठी भाषेचेही नुकसान आहे. तिसरी भाषा मुलांना शिकवायची नाही, असे सरकार म्हणते तर मग पुस्तक छपाई का सुरु आहे? पुस्तक छपाई सुरु असल्याचे मनसैनिकांच्या निदर्शनास आले आहे. याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असे दिसतेय.
याला शाळांनी सहकार्य करू नये. राज्य सरकार ‘वरून’ जे सांगतील त्याच्यामागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत.
मुळात विद्यार्थ्यांनी उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचे तसच महाराष्ट्राचे नाव मोठे करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झाले, आणखी भाषांची आता खरेतर काय गरज? पण हे राजकारण समजून घेतले पाहिजे! उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची.
त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. तुम्ही ठाम राहून सरकारचे मनसुबे उधळून लावले तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की. महाराष्ट्रात हिंदी लादबाबत असंतोष आहे, हे आपण ध्यानात ठेवावे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे, असे शिक्षणतज्ज्ञही सांगतात. भाजपला हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. हिंदी सक्तीला काँग्रेसचा विरोध असून राज्यात हिंदीची सक्ती लादू देणार नाही.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस