कात्रज - नणंदेच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने तिच्या मुलासह जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव परिसरात घडली. मयूरी शशिकांत देशमुख (वय ३१, रा. कल्पक सृष्टी, दळवीनगर) असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला मूळ बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील असून, ती कुटुंबासह खामगावला गेली होती. मात्र, ती रात्री एकटीच निघून आज सकाळी पुण्यात पोहोचली. पुण्यात परतल्यानंतर तिने मुलगा विष्णू शशिकांत देशमुख (वय ६) याच्यासह राहत्या इमारतीच्या छतावरून उडी मारून जीवन संपविले.
याबाबत माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीच्या छतावर पाहणी केली असता, आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने चिठ्ठी लिहिलेली आढळून आली.
त्यामध्ये 'नणंदेच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेत आहे' असे लिहिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती आंबेगावचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शरद झिने यांनी दिली.