Air India Flight : अहमदाबाद विमान अपघातानंतर Air India ने घेतला मोठा निर्णय; प्रवाशांचीही मागितली माफी, टाटा समूह काय म्हणाले?
esakal June 19, 2025 04:45 PM

Air India Flight Reduction : अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने त्यांच्या वाइडबॉडी विमानांच्या (Widebody Aircraft) आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय २० जून ते १५ जुलै या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत तांत्रिक अडचणींमुळे अचानक व्यत्यय निर्माण झाल्यास वापरण्यासाठी एक राखीव विमानही तयार ठेवण्यात आले आहे.

वाइडबॉडी विमानांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल

सदर निर्णय मागील काही आठवड्यांतील वारंवार घडणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि अहमदाबाद अपघाताच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. एअर इंडियाचे म्हणणे आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी ही तात्पुरती उपाययोजना राबवली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात अडथळे निर्माण होऊ शकतात, याची जाणीव एअर इंडियाला असून कंपनीने सर्व प्रवाशांची माफी मागितली आहे.

कंपनीकडून प्रवाशांची दिलगिरी

टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीची एअर इंडिया म्हणते की, 'या तात्पुरत्या कपातीमुळे प्रवाशांना काही अडचणींना सामोरे जावे लागेल, मात्र ही पावले सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विमानांच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी हा कालावधी उपयोगात आणला जाईल, जेणेकरून भविष्यात प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल.'

अहमदाबाद अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू

१२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर केवळ दोन मिनिटांत एअर इंडियाचे बोईंग एआय-१७१ हे विमान अपघातग्रस्त झाले. या भीषण दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर केवळ एक तरुण वाचला. या अपघातात विमान एका वसतिगृहावर आदळले, ज्यामुळे तेथील २९ लोकांचाही जीव गेला. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते, त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.