देशातील सर्वात मोठा वृत्त समूह TV9 नेटवर्कच्या दुबईतील जागतिक वैचारिक मंच न्यूज9 ग्लोबल समिटची दणक्यात सुरुवात झाली. UAE ने घेतलेली भरारी ही त्याच्या युनिक डीएनएमुळेच असल्याचे TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले. युएईचे मंत्री शेख नाहयान मुबारक अल नाहयान हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार होते, काही महत्त्वाच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत, असे दास यांनी सांगितले.एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले की, न्यूज9 ग्लोबल समिट यूएईमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. प्रत्येक दिवशी चांगले करण्याची इच्छा हीच मानवजातीची कहाणी असल्याचे दास यांनी अधोरेखित केले. त्यांनी या संमेलनामागील त्यांची दृष्टी एकदम स्पष्ट केली.
दूरदर्शी नेत्यांमुळे UAE अद्भूत देश
सर्वात अगोदर दूरदृष्टीची गरज असते. तर ती दूरदृष्टी साध्य करण्यासाठी धैर्य आणि वचनबद्धतेची गरज लागते. मी हे सांगायला हवे की मी जेव्हा जेव्हा दुबईला येतो, तेव्हा मला या दूरदृष्टीची प्रकर्षाने आठवण येते. त्यामुळेच मी ‘दुबईला व्हिजन इन मोशन’ असे म्हणतो, असे एमडी आणि सीईओ बरूण दास म्हणाले.
“1971 मध्ये संयुक्त अरब अमीराताच्या स्थापनेपासून, या देशाच्या दूरदृष्टी लाभलेल्या नेत्यांनी यूएईला खरोखरच एक अद्भुत राष्ट्र बनवलं आहे. मला कल्पनाही करता येते, की त्यांच्या धाडसी स्वप्नांना साकार करताना त्यांना किती अडथळ्यांचा सामना करावा लागला असेल. मात्र, त्यांनी अपार चिकाटी आणि दृढ संकल्प दाखवला. आज यूएई एक समृद्ध, प्रगत आणि आधुनिक देश म्हणून जगासमोर उभा आहे. असा देश जो जगभरात इतरांसाठी प्रेरणास्थान आहे आणि अर्थातच ईर्ष्येचा विषय पण. आजचा अमीरात केवळ या प्रदेशापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे.” युएईच्या बहारदार कामगिरीचा उल्लेख करत टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी या देशावर कौतुकाचा वर्षाव केला.
अबू धाबीतील स्वामीनारायण मंदिर प्रेरणास्थान
“हा देश आता जागतिक व्यापार, उद्योग, नवकल्पना आणि संस्कृतीच्या बाबतीत जागतिक दर्जाचा आणि सुरक्षितआहे. मी फक्त दुबईतील बुर्ज खलिफाची गोष्ट करत नाही. जिथे जगातील सर्वात उंच इमारत आहे अथवा शॉपिंगचा अनुभव देणारा दुबई मॉल आहे. तर मी बोलतोय अबू धाबीतील सुंदर आणि भव्य स्वामीनारायण मंदिराबद्दल, जे इथल्या प्रत्येकासाठी निर्विवाद प्रेम आणि सहिष्णुतेचं एक अनोखं प्रतीक आहे. यूएईच्या यशाचं गमक त्याच्या अनोख्या DNA मध्ये दडलेलं आहे. त्यामुळेच आम्ही दुबईमध्ये आमचं दुसरं आंतरराष्ट्रीय News9 ग्लोबल समिट आयोजित करण्याचा निर्णय घेतला, हे कुणालाही आश्चर्य वाटण्यासारखं नाही.” असे TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितले.
ग्लोबल साऊथमध्ये यूएई आज आपला खास मित्र
“आमचं उद्दिष्ट फार साधं आहे. यूएईचे राष्ट्रपती महामहिम शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वात उंची गाठणाऱ्या द्विपक्षीय संबंधांमध्ये एक फोर्स मल्टीप्लायर होणं हे आमचं साधं उद्दिष्ट आहे. म्हणूनच आमच्या समिटची थीम आहे, ‘प्रगती आणि समृद्धीसाठी भारत-यूएई भागीदारी’.” असे TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी यावेळी भारत आणि यूएई यांच्यातील दृढ संबंधांवर मोठे भाष्य केले.
“2015 साली, जेव्हा भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 34 वर्षांनंतर संयुक्त अरब अमीरातची यात्रा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले, तेव्हा अनेक लोक आश्चर्यचकित झाले की ते या देशाला इतकं महत्त्व का देत आहेत. पण आपल्या पंतप्रधानांप्रमाणेच माझाही विश्वास आहे की भारत आणि यूएई यांच्यात केवळ परस्पर समृद्धीसाठीच नव्हे, तर संपूर्ण प्रदेशात प्रगतीला चालना देण्यासाठी आणि ‘एशियन सेंच्युरी’ या दृष्टीकोनाला वास्तवात आणण्यासाठी एक परिवर्तनकारी आर्थिक भागीदारी घडवण्याची क्षमता आहे. त्यावेळी कदाचित यूएई भारताचा सर्वांत महत्त्वाचा किंवा सामरिक भागीदार नसेल, पण गेल्या 10 वर्षांत तो आपल्या सर्वांत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक आणि प्रमुख व्यापारी भागीदार झाला आहे. आज ग्लोबल साऊथमध्ये यूएई आपला एक खास, विश्वासू मित्र आहे.” महामहिम शेख मोहम्मद बिन जायद यांनी सुद्धा द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर वारंवार भर दिला आहे. दोन्ही देशांच्या नात्यात फेब्रुवारी 2022 हा निर्णायक क्षण होता. त्यावेळी दोन्ही देशांनी भारत-यूएई कंपरेहेंसिव इकोनॉमिक एंग्रीमेंट (India-UAE Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) करारावर स्वाक्षरी केली याची आठवण दास यांनी आवर्जून काढली.
दोन्ही देशांचे नेते दूरदृष्टीचे आणि प्रगतीशील
“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि यूएईमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट वाढून 83 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. तर 2030 पर्यंत तो 100 अब्ज डॉलर्सच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यामध्ये कोणालाही आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. मला अगदी स्पष्ट आठवतं – जेव्हा गेल्या वर्षी महामहिम भारतात आले होते, तेव्हा त्यांनी CEPA (Comprehensive Economic Partnership Agreement) संदर्भात म्हटलं होतं की, ‘भारतासोबतची भागीदारी ही आमच्या परराष्ट्र धोरणाचा आधारस्तंभ आहे आणि आमच्या आर्थिक विविधीकरण आणि विकासाचे एक प्रमुख साधन आहे. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि संस्कृती यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये ही व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’” याविषयीच्या आठवणींना दास यांनी उजाळा दिला.
“महामहिमांचं नेतृत्व यूएईमध्ये खरंच अद्वितीय आहे, कारण तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दूरदृष्टी असलेले आणि प्रगतिशील आहेत. हे आपल्याला एक महत्त्वाचं तत्त्व शिकवतं की, ‘आपण तेच आहोत, जे आपल्या मनात आहे’. ही गोष्ट प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था आणि प्रत्येक देशासाठी लागू होते.
भारत आणि यूएई या दोन्ही नेत्यांसाठी आर्थिक प्रगती आणि समृद्धी हे मुख्य लक्ष आहे. पण ही प्रगती आणि समृद्धी सर्वांसाठी समान असावी, सर्वसमावेशक असावी, हे विसरून चालणार नाही. या दोन्ही नेत्यांनी इतर सर्व बाबतींतही सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाची खात्री दिली आहे, असे TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सांगितले.