आळंदीतून आज माउलींचे प्रस्थान!
Marathi June 19, 2025 09:25 PM

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह आळंदी मंदिरातून गुरुवारी (दि. 19) पंढरीच्या दिशेने हरिनाम गजरात प्रस्थान ठेवणार आहे. राज्य परिसरातून वारकरी, भाविक दिंड्या-दिंड्यांतून आळंदीत हरिनामाचा गजर करीत दाखल झाले आहेत. यावर्षी राज्यात पुन्हा कोरोना महामारीचे सावट डोके वर काढीत असताना कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने सावट टळले आहे. तरी प्रशासनाने भाविक, वारकरी यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत आषाढी यात्रेचे नियोजन व्यवस्थित केले आहे.

आळंदीत बुधवारी (दि. 18) श्रींच्या अश्वांचे आगमन झाले असून, राज्यातील भाविक हरिनाम गजरात दाखल होत आहेत. आळंदीत हरिनामाच्या गजरात कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताहात हरिजागर सुरू झाला आहे. गुरुवारी (दि. 19) माउली मंदिरातून ‘श्रीं’ची पालखी पंढरीला जाण्यास रात्री उशिरा प्रस्थान ठेवणार आहे.

पायी वारी व्हावी अशी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वारकरी भाविकांची इच्छा असते. भाविक, वारकरी यांना पायी वारी सोहळा अनुभवता येणार आहे. वारकरी भाविकांनीही स्वतः सह इतरांची काळजी घेऊन वारीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री जोग महाराज प्रासादिक दिंडी क्र. 69चे अध्यक्ष गजानन महाराज लाहुडकर यांनी केले आहे.

पालखी सोहळ्यास मोठा बंदोबस्त तैनात
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थानानिमित्त प्रभावी पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. वारीकरिता मोठा फौजफाटा देहू आणि आळंदी येथे तैनात करण्यात आला आहे. यामध्ये नियोजन करताना वाहतूक व्यवस्था, पार्किंग, गर्दीचे नियोजन, वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था तसेच गुन्हेगारी नियंत्रणाकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.