Air India : आठवडाभरात ८० उड्डाणे रद्द; गुजरात विमान दुर्घटनेनंतरची स्थिती, हवाई प्रवासाला विलंब
esakal June 19, 2025 05:45 PM

वाराणसी/नवी दिल्ली : गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर विमान कंपनीकडून अधिक खबरदारी घेतली जात असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने आठवडाभरात ८० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, नवी दिल्लीत वातावरण खराब असल्याने बालीहून दिल्लीकडे येणारे एअर इंडियाचे विमान मंगळवारी वाराणसीच्या लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळविल्याचा प्रकार घडला.

अहमदाबाद विमानतळाजवळील दुर्घटनेनंतर एअरलाइन कंपनीने आठवडाभरात ८० हून अधिक उड्डाणे विविध कारणांनी रद्द केली. मंगळवारी एअर इंडियाने सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली होती. त्यामुळे हवाई प्रवासाला विलंब होत आहे. दरम्यान, बालीहून दिल्लीकडे येणारे विमान वाराणसीला वळविल्याचा प्रकार काल घडला.

वाराणसीच्या लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक पुनीत गुप्ता म्हणाले, एअर इंडियाचे विमान ‘एआय २१४६’ ला वातावरण खराब असल्याने आणि दृश्यमानता कमी राहिल्याने दिल्लीऐवजी वाराणसीकडे वळवावे लागले. १८७ प्रवाशांसह विमान वाराणसीत सुरक्षितपणे उतरले. यादरम्यान प्रवाशांना सर्वप्रकारच्या सुविधा देण्यात आल्या. दिल्लीतील हवामान स्वच्छ झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर रात्री विमान दिल्लीकडे रवाना झाले.

एआय २१३६ विमान बालीतील डेनपसार विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता उड्डाण करायचे होते आणि दुपारी २.३० वाजता दिल्लीत उतरायचे होते. परंतु या विमानाला दुपारी वाराणसीत उतरविले. अन्य एका घटनेत बाली विमानतळाजवळ ज्वालामुखी फुटल्याने नवी दिल्लीहून बालीला जाणारे विमान परत पाठविले. यासंदर्भात एअर इंडियाच्या निवेदनात म्हटले, १८ जून रोजी दिल्लीहून बालीला रवाना झालेले एअर इंडियाचे विमान एआय २१४५ हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाली विमानतळावर उतरण्यास असमर्थ ठरले.

हवाई वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली विमानतळावर मंगळवारी हवाई वाहतुकीत अडथळे आल्यामुळे चौदा विमाने वळविण्यात आली. यात सहा भोपाळ, तीन चंडीगड, दोन अमृतसर, प्रत्येकी एक-एक अहमदाबाद, वाराणसी आणि लखनौ.‘फ्लाइटरडार २४’ च्या आकडेवारीनुसार, मंगळवारी विमानतळावर ४०० हून अधिक विमानांना उशीर झाला तर काही रद्द करण्यात आले.त्यामुळे प्रवासाला विलंब होत आहे.

सिंगापूर एअरलाइन्सचे मौन कशामुळे? : पटेल

मुंबई : अहमदाबादच्या एअर इंडिया बोइंग ड्रिमलायनरच्या अपघातासंदर्भात सिंगापूर एअरलाइन्सने बाळगलेल्या मौनावरून माजी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सिंगापूर एअरलाइन्सचा टाटा सन्सच्या एअर इंडियामध्ये २५.१ टक्के भागीदारी आहे आणि एअरलाइन्सच्या मंडळावर एका सदस्याचा समावेश आहे. सिंगापूर एअरलाइन्सने बाळगलेले मौन आश्चर्यकारक असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.