टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’चे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आलं आहे. या समिटची थीम भारत-यूएई भागीदारी: समृद्धी आणि प्रगतीसाठी अशी आहे. गुरुवारी या समिटमध्ये ‘टेक्टोनिक टॅरिफ : नेव्हिगेशन द न्यू वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये WTO चे माजी भारतीय राजदूत जयंत दासगुप्ता, सीएसईपीचे अध्यक्ष डॉ. लवीश भंडारी आणि बेवर्ली हिल्स पोलो क्लबचे सीईओ अजय बिंदू हे सहभागी झाले होते.
चर्चेचा मुख्य विषय हा अमेरिकेनं टॅरिफ धोरणात अचानक केलेला मोठा बदल हा होता. 1938 नंतर करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ असल्याचं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं टॅरिफमध्ये प्रचंड वाढ केली, या वाढीमुळे जगभरातील धोरणकर्त्यांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाचा जागतिक व्यापाराला मोठा फटका बसू शकतो, या धोरणामुळे जागतिक व्यापाराचे नियम अस्थिर झाले आहेत. मात्र या अस्थिरतेच्या काळात एक नवा पर्याय म्हणून उदयास येण्याची भारताला मोठी संधी आहे, असा या पॅनलमधील चर्चेचा सूर आहे.
पॅनलने असं म्हटलं की, भारताची मजबूत देशांतर्गत मागणी, राजनैतिक समज आणि अलिकडच्या काळात झालेल्या धोरणात्मक सुधारणा हे सर्व घटक जगतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अमेरिकेनं चीनवर प्रचंड टॅरिफ लावलं आहे, त्यामुळे भारताला ही एक चांगली संधी आहे.
दरम्यान या चर्चेमध्ये भारत आणि यूएईमधील व्यापक आर्थिक भागीदारी करारावर देखील भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते हा करार द्विपक्षीय व्यापार धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा करार भविष्यामध्ये एक उत्तम उदाहारण म्हणून पुढे येऊ शकतो.
दरम्यान जगातील वाढता आर्थिक राष्ट्रवाद आणि सध्या मोठ्या देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांवरही पॅनलमध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेनं घेतलेली माघार आणि देशांतर्गत उत्पादनावर दिलेला भर, या बदलामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येऊ शकतो, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. हा काळ निश्चितच प्रचंड आव्हानांनी भरलेला आहे, असंही पॅनलने म्हटलं आहे.