कनानस्किस (कॅनडा) : ‘‘भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीत लवकरच उच्चायुक्त पुन्हा नियुक्त करण्याबाबत सहमती दर्शवली आहे,’’ असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.
संबंध स्थिर करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची ‘जी-७’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे मिस्री म्हणाले.
मिस्त्री यांनी याबाबतचे एक व्हिडिओ निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये ते म्हणाले, ‘‘या बैठकीत भारत-कॅनडा संबंधांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. दोन्ही देशांमधील सामायिक मूल्ये, लोकशाही, कायद्याची व्यवस्था अशा अनेक साम्य असलेले मुद्दे चर्चिले गेले.
दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पावले उचलण्यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीमध्ये उच्चायुक्तांची नियुक्ती करणे हे त्यातील पहिले पाऊल असणार आहे. योग्य वेळी व्यापार, परस्परांशी लोकसंपर्क आणि इतर क्षेत्रांमध्ये या पातळीवरील चर्चा सुरू होईल, यावर दोन्ही पंतप्रधानांचे एकमत झाले.’’