लीडस् : ब्लॉकबस्टर मालिका म्हणून पाहिले जात असलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली प्रतिस्पर्धी नसणार हे न पटणारे आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला त्याची झुंजार वृत्ती आणि जिंकण्याच्या तीव्र इच्छाशक्तीचा तोटा जाणवू शकेल, असे मत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने व्यक्त केले आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित कसोटी मालिका दोन दिवसांवर आलेली असताना स्टोक्सने विराट कोहली नसण्यावरून भारतीय संघाविरुद्ध अप्रत्यक्षपणे माईंडगेम सुरू केला आहे.
रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे भारतीय संघ आता प्रामुख्याने फलंदाजीत संक्रमणाच्या मार्गावर आहे, तसेच या मालिकेत शुभमन गिलही प्रथमच नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.
विराट कोहलीची अनुपस्थिती भारताला जाणवेल, असे म्हणताना त्याने विराटच्या लढाऊ बाण्याची उणीव भारताला जाणवेल, असे स्पष्टपणे सांगताना स्टोक्स म्हणतो, विराट कोहलीने १८ या क्रमांकाचा दरारा निर्माण केलेला आहे. आता हा क्रमांक कोणत्याही खेळाडूच्या जर्सीवर दिसणार नाही. विराटने प्रदीर्घ काळ आपले अस्तित्व निर्माण करून ठेवलेले आहे.
एकीकडे ट्वेन्टी-२० प्रकाराचे प्रस्थ वाढत असतानाही आपल्या पूर्ण कारकीर्दीत कसोटी क्रिकेटचे महत्त्व कायम ठेवले होते. विराटसाठी कसोटी क्रिकेट हे अतिशय जवळचे होते. मलाही कसोटी क्रिकेटबाबत अधिक प्रेम आहे, म्हणून विराटने या निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याला संदेश पाठवला होता, असे स्टोक्सने सांगितले.