Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) पक्षाच्या वर्धापनदिनी भाजपा, शिंदे गटावर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या या भाषणात मनसेसोबतच्या युतीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात भाजपा पक्षाचे नेते नितेश राणे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली.
सध्या हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावले जात आहे. भाजपाचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची केवढी, तुझा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही, असा थेट टोला उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
तसेच पुढे बोलताना, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय आहे? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे? आणि आमच्यावरती बोलत आहेस, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांना अप्रत्यक्षपणे खिजवलं. तसेच पुढे बोलताना कोणतातरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय. हे त्यांना कळू द्या. आज शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच आहे. भगवा एकच आहे. दैवत, विचार एकच आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ही महाराष्ट्रावर, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी, हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी केली. शिवसेनेची स्थापना ही शेठजींची पालखी वाहण्यासाठी केली नाही. शेठजींचे बूट चाटण्यासाठी केली नाही, हे अगोदर त्या मिध्याला सांगा, असाही हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.