मुंबई : चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी गावी जातात, मात्र त्यांच्या वाटेला सतराशेसाठ विघ्न येताना दिसतात. यंदा गणपती उत्सव लवकर आल्याने कोकण रेल्वेने गणपती स्पेशल गाड्या दरवर्षी प्रमाणे याही वेळी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने काही महिन्यांपूर्वी तिकीट आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आता यावर्षी कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांना 60 दिवस आधी आरक्षित तिकीट काढावे लागणार आहे. यासाठी आता कोकण रेल्वेनेही पावसाळी वेळापत्रकात बदल करून गणपती स्पेशल आरक्षण लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Reservations for regular Konkan Railway trains will begin from June 23 this year for Ganeshotsav)
यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला म्हणजे मागील वर्षीपेक्षा लवकर साजरा होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दरवर्षी प्रमाणे याही वेळी गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. चाकरमानी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी 2 दिवस कोकणात जात असतात. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टला असल्यामुळे चाकरमानी 25 आणि 26 ऑगस्ट रोजी कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांचं आरक्षण करतील. याचपार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने यंदा 23 जूनपासून कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी रस्ते मार्गे किंवा रेल्वे मार्गे कोकणात पोहचतात. मात्र अद्यापही मुंबई गोवा महामार्ग बनलेला नसल्यामुळे चाकरमानी जास्त करून रेल्वे मार्गे कोकणात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दरवर्षी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवाच्या सुमारास 250 हून अधिक गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा प्रयत्न करत असते.
हेही वाचा – Politics : मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर, उद्धव ठाकरे त्यांचं जास्त ऐकतात; शिंदे गटाची टीका
हेही वाचा – Sanjay Raut : फडणवीसांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाची अघोरी पूजा, राऊतांच्या आरोपाने खळबळ