मुंबईतील नामांकित साठे कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साठे कॉलेजमध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. मात्र या घटनेनंतर तरुणीच्या पालकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. यामुळे आता साठे कॉलेज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नामांकित साठे कॉलेजमध्ये संध्या पाठक या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संध्या ही स्टॅटिस्टिक्स विभागात शिक्षण घेत होती. आज कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिने आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
ही घटना घडताच कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. काही विद्यार्थ्यांनी तातडीने प्रशासनाला आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच विले पार्ले पोलीस तत्काळ कॉलेजमध्ये दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
संध्याच्या कुटुंबीयांनी तिने आत्महत्या केली नसून कोणीतरी तिला ढकलल्याचा आरोप केला आहे. "संध्या मानसिकदृष्ट्या खंबीर होती, तिने असे पाऊल उचलले असण्याची शक्यता नाही, तिची हत्या करण्यात आली आहे, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले आहे. तर कॉलेज प्रशासनाने प्राथमिक माहितीमध्ये सांगितले की, संध्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तिने हे पाऊल का उचलले, हे अद्याप समोर आले नाही.
पोलीस तिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण तपासत आहेत. पोलीस विभागाकडून सध्या कॉलेजमधील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमागील नेमका उद्देश, दबाव किंवा कोणतीही पार्श्वभूमी याचा तपास करण्यासाठी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.