शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसण्याचा प्रयत्न केला तर भाजपचा नामोनिशाण मिटवू! उद्धव ठाकरे कडाडले, मुंबई जिंकण्याचा निर्धार
Marathi June 20, 2025 01:24 AM

”ते शिवसेना संपवायचं स्वप्न बघत आहेत. तुम्ही कितीही शिवसेना संपवायचं स्वप्न बघा. तुम्हाला जर कुणाला वाटत असेल तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण महाष्ट्राच्या धरतीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रातून भाजपचं नामोनिशाण पुसून टाकू, अशा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापन दिन सोहळा शीव येथील ष्णमुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात विरोधकांची सालटी काढली.

https://www.youtube.com/watch?v=b6pc5xpxoqs

उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताच संपूर्ण सभागृहात शिवसेनेचा जयघोष झाला. काही मिनिटे हा जयघोष थांबतच नव्हता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘हा जयघोष जर विरोधकांनी ऐकला तर त्यांचे नॅपकिनसह सगळे कपडे ओले होतील, असा सणसणीत टोला मिंधे व भाजपला लगावला. ”तुमच्याशी काय बोलायचं हा प्रश्न पडलाय. हे जे चित्र आहे वातावरण आहे हे वातवारण कुणाच्याही भाग्यात असं प्रेम लिहलं असेल. ही माझी पुण्याई नाही. ही माझ्या पूर्वजांची पुण्याई. तुमच्या सर्वांचं अतोनात प्रेम. आता इथे जो जयघोष होतोय तो जरी विरोधकांनी पाहिला तर त्यांचे नॅपकिनसह सगळे कपडे ओले होतील. त्यांना प्रश्न पडेल की पक्ष फोडला, एवढी माणसं चोरली, चिन्ह चोरलं तरी शिवसेना संपत कशी नाही, हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही. त्यांना कल्पना नाही की शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून, विचार पेरून हे शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलं आहे. पैसे फेकून जमवलेली ही माणसं नाहीत. विचार अंगात भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ट महाराष्ट्र धर्म पाळणारी ही माणसं आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”59 वर्ष झाली. शिवसेना आज सुद्धा तरुण आहे, शिवसेना नेहमी तरुणच राहणार आहे. आपला पहिला मेळावा शिवतिर्थावर झाला होता. शिवाजी पार्क भरलं होतं. त्यावेळी अनेकांनी शिवसेनाप्रमुखांना सांगितलं होतं की एवढं मोठं मैदान का घेताय, एखादं सभागृह घ्या. मात्र शिवसेनाप्रमुखांनी शिवतिर्थावरच मेळावा घेतला. त्यावेळी शिवतीर्थ भरून गेलं होतं. तेव्हा असा पैसा फेको तमाशा देखो असा चोरांचा बाजार नव्हता. त्या सभेला मी समोर मैदानात माँच्या बाजूला मांडी घालून बसलो होतो. आज जे दाढी फुटली व ती दाढी खाजवत आहेत ते तेव्हा कुठे होते माहित नाही. मला खरच कीव येते जे आपला बाप बदलतात. राजकारणात ज्यांना पोर होतं नाहीत अशी लोकं घराणेशाहीवर टीका करतात त्यांची मला कीव येते. भारतीय जनता पक्ष असाच आहे. सत्य नाकारलं नाही पाहिजे की ते आता दुसऱ्यांचे नेते डोक्यावर घेऊन फिरत आहेत. ज्या सरदार वल्लभभाई पटेलांनी संघावर बंदी आणली होती. त्याच पटेलांना नेता म्हणून जाहीर करून त्यांचा जगातला सर्वात उंच पुतळा बांधण्याची वेळ यांच्यावर आली आहे. आजच्या आपल्या वर्धापन दिनावर देखील भाजपची पाळलेली बेडकं डराव डराव करतील. या चोरांनी लाज लज्जा शरम ठेवलेली नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”मराठवाड्यातील माझ्या शिवसैनिकांचं मला कौतुक करायचं आहे. ‘क्या हुआ तेरा वादा’च्या माध्यमातून त्यांनी भाजपचे वादे कसे फसवे होते ते जनतेपर्यंत पोहोचवले. माझा प्रश्न त्यांना. निवडणूक जिंकण्यासाठी बहिणींशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा पाळत नाही, मग तो खरा होता की खोटा होता? यावरून यांची वृत्ती कळते. याचं सरकार आल्यापासून जी काही पनवती लागली आहे. सगळ्या कामांची वाट लागली आहे. एअरपोर्टचं छत गळतंय, मेट्रोमध्ये पाणी भरतंय, कुंभमेळ्यात माणसं चेंगरून मेली, दिल्लीत माणसं चेंगरून गेली, विमानात माणसं सुरक्षित नाही कुणी जबाबादारी घ्यायला तयार नाही. तसा आपण गांभिर्याने विचार केला तर देशाला पंतप्रधानांची गरज आहे. पंतप्रधान आहे कुठे ते तर भाजपचे पंतप्रधान आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शहांची नाही. देशाला संरक्षणमंत्र्यांची गरज आहे, गुंडाना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची नाही. मोदीजींना मला विचारायच आहे जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिद्दीनसोबत तुलना करायला. जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर आज जगभरात तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक करण्यासाठी आमचे खासदार का पाठवले. तुम्ही जगभर फिरलात पण या कठिण काळात एक देश तुमच्यासोबत उभा राहिला नाही. आम्ही उभे राहिलो तुमच्यासोबत. जग तुमच्या विरुद्ध आहे. आमची तुलना तुम्ही देशद्रोह्यांसोबत करताय आणि संकट आल्यावर आमचेच खासदार जगभरात पाठवताय. मी मुख्यमंत्री असताना डोकलाम झालं होतं. तेव्हाही आम्ही प्रधानमंत्र्यांना पाठिंबा दिला होता. पक्षीय मतभेद असतील, पण जगासमोर जेव्हा जाऊ तेव्हा हमसब एक है हे दाखवलं पाहिजे. ते करण्याचं पवित्र कर्तव्य आम्ही केलं’, असं उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.

”यांना नावं देखील बरी सुचतात. ऑपरेशन सिंदूर. हे घरोघरी जाऊन माझ्या माता भगिणींना सिंदूर वाटणार होते. यांचे सर्व भ्रष्ट गुंड, ज्यांना जोडण्याने हाणायला हवं असे ते माता भगिणींना सिंदूर वाटणार होते. आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलंय की आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही हिंदू आहोतच पण आम्ही राष्ट्रधर्म माणणारे कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. जो हा देश आपला मानतो, या देशासाठी मरायला तयार आहे, जो देशासाठी कुर्बानी देतो तो कुणी असला तरी तो आमचा आहे. मला मोदींना विचारायचं आहे ही आमची हिंदुत्वाची व्याख्या म्हटल्यानंतर नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय. आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलंय? मध्येच कधीतरी तुम्ही मशिदीत जाऊन सौगात वाटता. घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटायचा. कोण वाटणार तो सिंदूर, तो नालायक मंत्री विजय शहा, ज्याला भररस्त्यात चाबकाने फोडला पाहिजे त्याच्यावर भाजप काही कारवाई करत नाही. सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिणी आहेत त्यांना विजय शहा आतंकवाद्यांची बहिण म्हणतो, अशी नालायक औलाद भाजपमध्ये आहे, आणि या भाजपकडून आपण देश सुधरवण्याची अपेक्षा करतो. यांनी सैन्याचे पाय बांधलेयत. सैन्याने धडक दिली होती, आतापर्यंत पाकिस्तान घेतला असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला. काय करायचे ते असे प्रधानमंत्री. चार अतिरेकी आत आले कसे, संरक्षण मंत्री, गृहमंत्री काय करतायत. पर्यटकांना ठार करणारे अतिरेकी गेले कुठे, पाताळात गेले की आकाशात गेले? भाजपातही गेले असतील. आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलं आहे, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.

”जसं आपण घरोघरी जाऊन, शाखेमध्ये सदस्य नोंदणी करतो. भाजपने आता तुरुंगाच्या दरवाज्याबाहेर स्टॉल टाकले आहेत. इथे येतो का तिथे जातो. किती लोकांना बदनाम करायचं, भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायची, कुटुंबाला बदनाम करायचं, त्यांच्या मागे एसआयटी लावायची. आता यांच्या एसआयटीची काय एसटी झाली का. सगळ्यांना भ्रष्ट बोलायचं, बोंबलायचं की 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि स्वत:सोबत आलं की पाय धुवून पाणी प्यायचं. संपूर्ण देशाची वाट लावली आहे यांनी. आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघत आहेत. तुम्ही कितीही शिवसेना संपवायचं स्वप्न बघा. शिवसेना तुम्हाला संपवून, तुमच्या भ्रष्टाचाऱ्यांना संपवून तुमच्या छाताडावर भगवा नाय लावला तर शिवसेना नाव नाही सांगणार”, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

”आता आपल्याला भांडून चालणार नाही. भाजपची एक निती आहे. बटेंगे तो कटेंगे, असा त्यांनी नारा दिला होता. मुंबईत विशेषत: हिंदू हिंदूमध्ये मारामाऱ्या लावायच्या. हिंदी सक्तीची करायची. हिंदी सक्तीची झाली की ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं त्यांनाच दूर करायचं. हिंदी सक्ती तर होऊच देणार नाही. हिंदीसोबत आमचं काही वैर नाही. पण सक्ती कशाला करता. सक्ती करायची आहे तर तामिळनाडूत जाऊन बघा. नुसतं तुम्ही उच्चार करून बघा. ते काय करताय. गुजरातमध्ये करा हिंदी सक्ती. इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं. निवडणूकीच्या तोंडावर मराठी अमराठीमध्ये झगडा. त्याच्यावरून भांडत बसायचं. एकदा का आपण भांडायला लागलो की ते भ्रष्टाचार करायला मोकळे. मिंध्यांच्या काळात तीन हजार कोटींनी जास्त असलेले टेंडर्स सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. तीन हजार कोटी गेले कुठे. आपण मोर्चा काढला, आदित्यने पत्रकार परिषद घेतली. मुंबईतला रस्ता घोटाळा पैसा गेला कुठे? आमच्यावर घऱाणेशाहीचा आरोप करताना, आपल्यातूनच गेलेल्या एकाने भूखंड घोटाळा करून मुलासाठी हॉटेल वगैरे घेतलं. एका मंत्र्याच्या खात्यातील बदल्यात अनियमितता आहे, शिक्षण खात्यात घोटाळा आहे. फडणवीसांचा एक फोटो व्हायरल झाला होता. फडणवीस बसले होते व आजुबाजूला सगळे उपरे. मला आता भाजपवाल्यांची दया येतेय. किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यात घालवणार आहात. आता सतरंजीच्या खाली गेला आहात तुम्ही, तुमच्या वर उपरे नाचतायत. बस करा आता. तुमच्यात जरा तरी स्वाभिमान असेल तर या भ्रष्ट उपऱ्यांचं जोखड झुगारून टाका आणि मर्दासारखं बाहेर या आणि तुमची किती इंचाची छाती आहे ते दाखवा”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत. त्यासाठी हिंदी सक्तीची केली. मराठे मराठेतर आहेत, हिंदू मुस्लीम आहेच, तो एक बेडूक त्यावर ओरडतोय, तेवढचं काम दिलंय त्याला. अरे तुझी उंची केवढी आवाज कसा. उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. जीव काय बोलतोयस काय, वडिलांची पार्श्वभूमी काय. आणि आमच्यावर बोलतोयस. त्यांना कळू दे की एक कुणीतरी बाप ठरवा. जसा आम्ही 59 वर्ष झाली तरी आमचं दैवत एकच आहे, नेता एकच आहे, भगवा एकच आहे, विचार एकच आहे शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावर होणाऱ्या अन्याचा मुकाबला करण्यासाठी व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली. शेठजींची पालखी वाहण्यासाठी, त्यांचे बूट चाटण्याासाठी नाही केली हे त्या मिंध्याला जाऊन सांगा, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

”हे गद्दारीने फसफसले आहेत. लाडकी बहिणीला पैसे द्यायला आदिवासींचा निधी त्यांच्यात वळवतायत, एसटीला पैसे द्यायला निधी नाही पण धारावीत अदानीला मुद्रांक शुल्क माफ केलंय. अदानीला सगळं काही माफ, जागा फुकट. मी 500 फूटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द केला होता तो आता यांनी लादला आहे. कचरा कर लावणार आहेत तो आता स्थगित केला, रद्द नाही केला. अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची नाही तर 1960 साली ज्या मराठी माणसाने रक्त सांडून बलिदान मुंबई मिळून दिली. म्हणून जर आपण उभे राहिलो तर ही मुंबई आपल्याला मिळेल. मुंबई आम्ही घेणार आहोत. मुंबई जर पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार. त्यामुळे मराठी माणसं एकत्र व्हायला नको. त्यासाठी हे शेठजींचे नोकर आहेत. तेच शेठजींचे नोकर आज नालायकपणे वर्धापन दिन साजरा करत आहेत. जर तुम्हाला कुणाला वाटत असेल तर तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण महााष्ट्राच्या धरतीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामोनिशाण पुसून टाकू भाजपचं या महाराष्ट्रातून, असा खणखणीत इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

”मला भाजपला सांगायचं आहे की असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चन सारखं अॅम्ब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याला पण जाताना आडवे होऊन जाल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.