(Thackeray on BJP) मुंबई : आज महाराष्ट्राची आणि देशाची चिंता तशी कुणालाच नाही. व्यापारी सत्तेच्या खुर्च्यांवर बसले की, दुसरे काय होणार? हा देश आधी डच, पोर्तुगीज, मोगल, इंग्रजांनी लुटला. ज्या ‘सुरत’ची लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी केली तेच सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी आता मुंबई-महाराष्ट्रच नव्हे, तर देश लुटत आहेत, असा हल्लोबल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Thackeray attacks BJP and Shinde on the occasion of the party’s anniversary)
बाळासाहबे ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज, गुरुवारी 59व्या वर्धापन दिनानिमित्त सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना 59 वर्षांची झाली. शिवसेनेचा हा प्रवास नेहमीच खडतर आणि संघर्षाचा राहिला, पण त्या संघर्षाचे, संकटाचे कधी रडगाणे कोणी गायले नाही. लढण्याचे प्रसंग जेव्हा जेव्हा आले, तेव्हा तेव्हा लढणारे शिवसेनेसोबत राहिले आणि रडणारे पळून गेले, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Shiv Sena Anniversary : आपल्या मुळावर उठणाऱ्याचा हिशेब करावाच लागणार, दानवेंचे शिवसैनिकांना खुले पत्र
शिवसेनेच्या स्थापनेपासून तिच्या वाईटावर टपून बसलेल्या अवलादी आजही आहेत. आपलेच मराठी बांधव खास करून त्यात आहेत. सत्ता आणि पैशांच्या मगरुरीने मस्तवाल झालेल्या छत्रपती शिवरायांच्या काळातही अशा अवलादी होत्याच. मराठी जनांचे ‘हिंदवी’ स्वराज्य निर्माण होऊ नये म्हणून तेव्हा शिवरायांच्या आसपासच्या स्वकीयांनीच फितुऱ्या केल्या. तेच फितूर छत्रपती संभाजीराजांनाही अडथळे ठरले आणि त्याच फितुरांनी संभाजीराजांना मोगलांच्या हाती देऊन महाराष्ट्र धर्माशी बेइमानी केली. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पायदळी तुडवून गुजराती व्यापार मंडळाच्या कच्छपी लागलेल्या अवलादीबाबत कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जे लोक छत्रपतींचे स्वराज्य जमीनदोस्त करायला निघाले होते, त्यांच्या अवलादी आज वळवळत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करून मुंबई-महाराष्ट्राचा घास गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याच्या विचारात आहेत. नव्हे, त्यांनी मुंबईचा सौदा करूनही टाकला, पण जोपर्यंत स्वाभिमानी शिवसेना येथे ठामपणे उभी आहे, तोपर्यंत मुंबईचा तुकडा यांच्या बापजाद्यांना पाडता येणार नाही, असे वचनही त्यांनी दिले आहे.
शिवसेना शतायुषी होईल. त्यापुढे जाईल. जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून. महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे. पण एक मात्र नक्की, शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्नपुढे झुकणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : फडणवीसांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाची अघोरी पूजा, राऊतांच्या आरोपाने खळबळ