हिंदी सक्तीविरोधात विविध शाळांसह गट शिक्षणाधिकाऱ्यांना मनसेचे निवेदन
भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) ः सरकार छुप्या मार्गाने महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी लादल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. हा कावा मराठी माणसानं वेळीच ओळखावा म्हणून राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरात मनसेकडून हिंदी सक्तीविरोधात निवेदन देण्यात येत आहेत. तर, भिवंडीतही मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अधिकाऱ्यांना हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे यांचे पत्रासह निवेदन दिले आहे. शिष्टमंडळत लोकसभा संपर्क संघटक मदन पाटील, तालुकाध्यक्ष विकास जाधव, भरत पाटील, संजय पाटील, मिलिंद तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी पी. आर. विद्यालय व एन. ई. एस. शाळा मुख्याध्यापकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रासह निवेदन देत हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा परेश चौधरी यांनी दिला आहे. या शिष्टमंडळात शहराध्यक्ष मनोज गुळवी व पदाधिकारी सहभागी झाले होते.