दारू पार्ट्यांचा बंदोबस्त, अनावश्यक वाहतुकीला नो एंट्री, तगडी गस्त; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षेसाठी तिहेरी कवच
Marathi June 20, 2025 07:24 AM

>> आशीष बनसोडे

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिस्त, मेहनत आणि कर्तव्याला विशेष महत्त्व देऊन वन आणि वन्य जिवांना मानवापासून धोका निर्माण होऊ नये याकरिता मुख्य वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी कंबर कसली आहे. यामध्ये दारू पाटर्य़ांचा बंदोबस्त करण्यात आला असून अतिक्रमणाविरोधात दंड थोपटले असून तगडी गस्त सुरू झाली आहे.

भारतीय वन सेवा अधिकारी अनिता पाटील यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक व संचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून वन व वन्य जिवांच्या रक्षणासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विस्तीर्ण पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरेच्या जंगलात आणखी मानवी अतिक्रमण होऊ नये, वन्य जिवांना मुक्त संचार करता यावा याला अनिता पाटील यांनी विशेष महत्त्व दिले आहे. यासाठी त्यांनी अधिकारी, कर्मचाऱयांना गणवेशात तगडी गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. गस्तीचे प्रमाण वाढल्याने उद्यानात अनुचित प्रकार घडण्यास पायबंद बसला असल्याचे अधिकारी व पर्यटक सांगतात.

अनावश्यक वाहतूक बंद

विहार गेट ते बोरिवली अशा निसर्गातून वाट काढत जाणाऱया मार्गावरील अनावश्यक वाहतुकीला पूर्णपणे बंद केले आहे. मागे या मार्गावर वाहन अपघातात हरणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कोणीही या मार्गावरून ये-जा करीत असल्याने वन्य प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. आता अनावश्यक वाहतूक बंद झाल्याने वन्य प्राण्यांचा मुक्त संचार होऊ लागल्याचे निसर्गप्रेमी सांगतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे मुंबईचा श्वास आहे. या निसर्ग संपत्तीची निगा राखणे, त्याचे संरक्षण व संवर्धन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी विविध उपाययोजना आम्ही राबवत असून ते फायद्याचे ठरत आहे? – अनिता पाटील, मुख्य वन संरक्षक व संचालक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.