पुणे : ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस!’ असा भाव मनात ठेवून, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरीकडे निघालेला वारकऱ्यांचा भक्तीसागर शुक्रवारी (ता. २०) पुण्यनगरीत दाखल होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (ता. १८) देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १९) आळंदीतून प्रस्थान झाले. या दोन्ही संतांचे पालखी सोहळे शुक्रवारी सायंकाळी पुण्यात एकत्र येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात; तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात असणार आहे. रविवारी (ता. २२) सकाळी या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.
या दोन दिवसांत वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, पाणी, निवासाची व्यवस्था केली आहे. महापालिका प्रशासनाने या तीन दिवसात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शेकडो कर्मचारी २४ तास स्वच्छतेसाठी नियुक्त केली आहे. रस्त्यांची, स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी, कचरा उचलण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
पालखीया मुक्कामाच्या ठिकाणी पुणे महापालिकेचे दवाखाने या तीन दिवसांत २४ तास वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी खुले राहणार आहेत. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी २२ आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी १६ वैद्यकीय पथकांची नियुक्ती महापालिकेने केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आयुक्त करणार पालख्यांचे स्वागतमहापालिकेवर प्रशासक असल्याने यंदादेखील महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम हे सकाळी अकराच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत करतील. तर दुपारी दीडच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत बोपोडी येथे केले जाईल. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पाटील इस्टेट येथे दोन्ही पालख्यांचे स्वागत महापालिकेतर्फे केले जाणार आहे.
वारकऱ्यांना सूचनापाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे
महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सवर वेळोवेळी लक्ष ठेवावे
पाणी साचणे, झाडे पडणे किंवा वीजविषयक तक्रारी असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.