कुंडलिका, अंबा, पाताळगंगाने ओलांडली इशारा पातळी; रस्ते जलमय
अलिबाग, ता. १९ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यामध्ये रविवारपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, रस्ते जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील अंबा, पाताळगंगा आणि कुंडलिका नदीने गुरुवारी धोक्याची पातळी ओलांडली. रोह्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून, शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने जिल्हाभरातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
अलिबाग शहरातील कामगार नाका, बसस्थानकात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जिल्ह्यातील २८ लघु पाटबंधाऱ्यांपैकी वावा, आंबेघर, श्रीगाव, कोंडगांव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, रानवली, वरंध, साळोख, कलोते-मोकाशी, डोणवत, मोरबे, बामणोली, उसरण, पुनाडे या १६ धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा झाला आहे. तसेच कार्ले, कुडकी, अवसरे या धरणांमध्ये ७५ टक्के, कोथुर्डे, खैरे या धरणांमध्ये ९९ टक्के आणि सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, भिलवले या धरणांमध्ये १०० टक्के जलसाठा झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांतील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून, तालुक व ग्रामपातळीवरील प्रशासनाला लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या आहेत.
तालुक्यातील रामराज नदीला पूर आल्याने बोरघर आणि रामराज गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. आपत्ती निवारण करणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील अनेक कक्षांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कमर्चाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील भाजी मार्केटमध्ये पाणी साचल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. रोह्यात कोलाड भागात एक घर जमीनदोस्त झाले. पालीमधील भेरव व नांदगाव पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
शाळांना सुट्टी :
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र हा आदेश उशिरा आल्याने सकाळी लवकर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन परतावे लागले.
ग्रामीण भागात बत्ती गुल
जिल्ह्यात मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने बहुतांश ग्रामीण भागात बुधवारी रात्रीपासून बत्ती गुल झाली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. तसेच वीजवाहिन्याही लोंबकळू लागल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.