IND vs ENG : भारताच्या जैसबॉलचं इंग्लंडला जोरदार प्रत्युत्तर, दुसऱ्या सत्रात टीम इंडिया चांगल्या स्थितीत
GH News June 20, 2025 10:07 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवशीचा खेळ यशस्वी जयस्वालने गाजवला. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला एक तास खूपच जपून खेळण्याचा होता. कारण खेळपट्टी थोडी ओलसर असल्याने गोलंदाजांना फायद्याची होती. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. पण ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर फटका मारताना केएल राहुल चुकला आणि रूटच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेला साई सुदर्शनही काही खास करू शकला नाही. त्याला पदार्पणाच्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. पण एका बाजूने यशस्वी जयस्वाल खिंड लढवत होता. पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रातही यशस्वी जयस्वाल इंग्लंडच्या गोलंदाजांवर भारी पडला. त्याला कर्णधार शुबमन गिलची जोड मिळाली.

यशस्वी जयस्वालच्या खेळी पाहून बेजबॉलवर जैसबॉल भारी पडला असंच म्हणावं लागेल. यशस्वी जयस्वालने 96 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 52.08 चा होता. यशस्वी जयस्वालचं कसोटीतील 11 अर्धशतक आहे. तो इतक्यावरच थांबला नाही त्याचा खेळ पुढेही सुरुच आहे. त्याची अशीच कायम राहिली तर लवकरच कसोटीतील पाचवं शतक ठोकेल. यशस्वी जयस्वालने तग धरला तर इंग्लंडला पहिल्या डावात तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात भारताने चांगल्या धावा केल्या तर गोलंदाजांना बुस्टर मिळू शकते.

दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 91 धावांची भागीदारी केली. भारताची इंग्लंडमधील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. जयस्वाल आणि केएल राहुलने 39 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सुनील गावस्कर आणि के श्रीकांत यांनी 1986 मध्ये इंग्लंडविरुद्ध 64 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर इतकी मोठी भागीदारी करण्याचा मान यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल जोडीला मिळाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.