उंड्री, : शाळेच्या मार्गावरच पाणी साठून राहिल्याने वडाची वाडीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे. शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर आवश्यक उपाययोजना करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
समाविष्ट गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या रखडलेल्या कामाचा आता विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे. येथील शाळेकडे जाणारा रस्ता समतल नसल्याने पाणी साठून राहत आहे. रस्त्याचे काम करताना पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावर माती वाहून आल्याने चिखल होत आहे. सिमेंटचा रस्ता असूनदेखील रस्त्यावर चिखलाचे आणि पाण्याचे साम्राज्य वाढले असल्याने साठलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना मार्ग काढावा लागत आहे.
दिवसभर चिखलाचे पाय घेऊनच शाळेत बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. या परिस्थितीचा शाळेतील मुलांच्या उपस्थितीवर परिणाम होत आहे. सुरुवातीलाच शाळा बुडवावी लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन दिवसांपूर्वीच महापालिकेकडून प्रत्येक शाळेत मुलांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला आहे. यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची प्रत्येक शाळेत नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भेट देऊनसुद्धा मुलांना येणाऱ्या अडचणी त्यांना का समजू शकल्या नाहीत? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहराच्या ठिकाणी अशा पद्धतीने मुलांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील समस्येवर योग्य उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सोपा करावा, असे येथील स्थानिक नागरिक प्रेम बांदल, युवराज धनवडे, नवनाथ चव्हाण यांनी सांगितले.
वडाची वाडीमधील शाळेच्या मार्गावर साठलेल्या पाण्याला वाट मोकळी करून रस्ता मोकळा करण्यासाठी तातडीने कर्मचारी पाठविले जातील.
- स्वाती बिराजदार, कनिष्ठ अभियंता, कोंढवा क्षेत्रीय कार्यालय