मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत सकारात्मक असतानाही राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वेळ आल्यास सर्व जागांवर निवडणुका लढवण्यासाठी तयार राहण्याची सूचना जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांच्या बैठकीत दिल्या. तसेच विधानसभा निवडणुकीत ४० लाख मतदार अचानक कसे वाढले? याची तपासणी घराघरात जाऊन करा, असे आदेशही त्यांनी गटप्रमुखांना दिले.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी, ‘राज्याच्या जे मनात आहे तेच करणार’, असे सांगत मनसेसोबत युती करण्याचे सूतोवाच केले. त्यापाठोपाठ आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवन येथे आयोजित केली.
या बैठकीत मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत अशीही कल्पना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे झाल्यास स्थानिक पातळीवर युती-आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
‘महिनाभरात हा अहवाल सुपूर्द करा. या अहवालावरून कुठे आघाडी किंवा युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल,’ असेही उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले. आणि जर युती-आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या.
४० लाख मतदार कसे वाढले हे शोधा
विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनीही ४० लाख मतदार कसे वाढले हे शोधण्याच्या सूचना गटप्रमुखांना दिल्या. मतदार याद्यांचा अभ्यास करा. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले, कुठे वाढले, बोगस मतदार शोधा. घराघरात जाऊन मतदार यादीप्रमाणे नावांची चौकशी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.