जून महिना म्हणजे ‘खरेदीचा महिना’ असं समीकरणच आहे. जून महिन्यात घरातील मुलासाठी काही घेतलंच नाही असं होत नाही.
पण ‘मुलांसोबत’ आणि ‘मुलांसाठी’ खरेदी म्हटलं, की त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. कारण प्रत्येक घराप्रमाणे ‘जून’ खरेदीचा वेगवेगळा प्रकार असतो.
पहिला प्रकार. दुकानात गेल्यावर एखाद्या वस्तूची निवड करताना होणारे मतभेद. रुसवे-फुगवे. मग टोकाचे मतभेद. नंतर ‘आत्ता तू ऐकणार आहेस की नाही?’ अशी एक हलकीशी धमकी. या धमकीला मुलाकडून शार्प नजरेनं, कडक देहबोलीनं; पण मौनात दिलेलं उत्तर असतं. मग आता ग्राहक हातातून सुटतो की काय? या विचारानं दुकानदार मुलाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो.
दुकानदार, ‘वस्तूची उपयुक्तता आजच्या मुलांना कशी समजत नाही, हीच वस्तू कशी योग्य आहे आणि आमच्याकडेच कशी स्वस्त आहे’ वगैरे बोलत ‘ग्राहक राजा किंवा राणीला’ पटवतो. आणि ‘जून’ खरेदीचा एक टप्पा पूर्ण होतो.
दुसऱ्या प्रकारात काही वेळा पालकांनाच खूप घाई असते, ‘जून’ खरेदी कशीबशी आटपून त्यांना दुसऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी लगेचच जायचं असतं. ही सुवर्णसंधी मुलांच्या आणि दुकानदारांच्या लगेचच लक्षात येते. अशावेळी दुकानदार मुलाकडे जरा अधिकच लक्ष देतात. त्यानं न मागितलेल्या वस्तूही दाखवतात.
वस्तू दाखवताना शक्यतो त्या महागच असतील याची काळजी घेतात. ‘ग्राहक राजा’ फोनवर बोलण्यात बिझी असल्यानं तो वस्तूची किंमत न बघता फक्त वस्तू बघतो आणि ‘हो..हो’ अशी मान हलवतो. बस्स झाली खरेदी. दुकानदार आणि मुलं खूश!
तिसऱ्या प्रकारात पालक तयारीतच आलेले असतात. ‘आपल्याला काय आणि किती घ्ययचं आहे’ याची यादीच त्यांनी आणलेली असते. घरून निघतानाच या यादीविषयी खूपसं एकमत झालेलं असतं. असे यादी घेतलेले ग्राहक दुकानात आले, की दुकानदार सावध होतात आणि दुकानातील ‘जुना-जाणता’ किंवा ‘बोलबच्चन’ विक्रेता अशा ग्राहकांवर सोडतात. ग्राहक राजा आणि विक्रेता दोघंही निष्णात असल्यानं एखादा सुवर्णमध्य काढूनच ‘जून’ खरेदी संपते.
या सर्व ठिकाणी मुलांचा आत्मसन्मान जपला जातोच असं नाही. ज्याच्यासाठी खरेदी केली जात आहे, त्याचं मत आणि मन समजून घेतलं पाहिजे. त्याचं चुकत असेल, तर त्याची चूक त्याला वारंवार न दाखवता योग्य काय आहे आणि का योग्य आहे हे समजावून सांगितलं पाहिजे.
इथेच काहीवेळा पालकांची गफलत होते. खरेदीच्या मोक्याच्या क्षणी किंवा घरी बसून खरेदीची यादी करत असताना पालकांना अचानक त्यांचं गरीबीत गेलेलं बालपण आठवतं. आणि मग पालक सुरूच होतात...
‘करायची काय नवीन सॅक? आणि ती पण स्पायडरमॅनचं चित्र असणारी? आम्ही तर शाळेत जातान पिशवीतून पुस्तकं न्यायचो. इतकी महागातली पेनं, पेन्सिली कशाला हव्यात? अरे, या पेनाची जेवढी किंमत आहे तेवढे मार्क तरी गणितात मिळवाल का?
अभ्यासात मार्क शून्य आणि पेन्सिली महागातल्या? आणि ते रंगीत सुवासिक खोडरबर? ते कशाला? ही इतकी महागडी पेन्सिल बॉक्स? काहीतरीच काय? आमच्यावेळी तर आम्ही उदबत्तीच्या खोक्यातून पेन्सिली न्यायचो..’ ही न संपणारी सीडी खूपवेळ वाजत राहते. पण आई वडिलांची लहानपणीची गरीबी ऐकून कुठलाही मुलगा प्रभावित होत नाही.
मुलगा वडिलांकडे उदात्त भावनेने पाहत, ‘बाबा तुमचं खरं आहे. नको तो पेन्सिल बॉक्स आणि नको तो उदबत्तीचा खोका. मी माझ्या पेन्सिली कागदात गुंडाळून घेऊन जाईन हो. पुस्तकं कापडी पिशवीतून नेईन. यामुळे मी खूप अभ्यास करुन मोठा होईन बाबा..’ असं कुठलाही मुलगा म्हणत नाही. आणि मुख्य म्हणजे ‘हे माहीत असूनही’ अनेक पालकांना ‘असं बोलल्याशिवाय’ चैन पडत नही.
यातून मार्ग काढणं शक्य आहे. यासाठी एक सोपं सूत्र वापरता येईल. पालकांनी आपलं बालपण आणि सध्याचं मुलांचं बालपण यांची अजिबात तुलना करायची नाही. मुख्य म्हणजे खरेदीला जाण्याअगोदर आपलं बजेट मुलांना सांगितलं, तर खरेदी करताना सुवर्णमध्य काढणं सोपं जातं. महागाई वाढल्यामुळे थोडंसं बजेट वाढू शकेल; पण घ्यायची वस्तू अत्यंत आवश्यक असेल तरच.
हा मुद्दा मुलांना पटू शकतो. खरेदीच्यावेळी मुलाला मत मांडण्याची संधी मिळायलाच हवी. पालकांनी मुलाचं मत ऐकल्यानंतर दुकानदाराचं मत फक्त ‘ऐकून घ्यावं’; पण निर्णय घेताना मुलं आणि पालक यांनी मिळूनच घ्यावा. तरच खरेदीचा आनंद द्विगुणित होतो.
‘जून खरेदी म्हणजे मूल आणि पालक यांचं नातं बळकट करण्याची एक संधी’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.