अग्रलेख : एक कडवट संध्याकाळ!
esakal June 21, 2025 11:45 AM

राज्याच्या राजकारणाचे सध्याचे स्वरूप आशयविहीन आणि पोकळ होत चालले आहे. त्याचेच प्रतिबिंब मुंबईतील शिवसेनेच्या दोन गटांच्या दोन मेळाव्यात दिसले.

मराठी माणसाच्या भल्यासाठी ५९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शिवसेना नावाच्या कडवट संघटनेची आता दोन शकले झाली आहेत. त्याचीही आता मराठी मतदारांना सवय होते आहे. पुढल्या वर्षी ही संघटना साठीत शिरेल. पण साठीच्या उंबरठ्यावर आलेल्या या संघटनेची भाषा मात्र तीच आणि तशीच राहिली आहे.

बाळासाहेबांच्या पश्चात फाटाफुटीनंतर झालेली शिवसेनेची दोन्ही शकले भाषणबाजीतला कडवटपणा वजा करू शकली नाहीत, हे गुरुवारी मुंबईत झालेल्या वर्धापनदिनाच्या दोन्ही मेळाव्यातून दिसून आले. अर्थात यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. कारण शिवसेना हा पक्ष प्रगल्भ व्हावा, अशी मतदारांचीही अपेक्षा नसते, आणि खुद्द नेतृत्वालाही त्याची गरज वाटत नाही.

किंबहुना प्रगल्भ राजकीय पक्ष उरला आहे तरी कुठला? हाच खरा सवाल आहे. गुरुवारच्या मेळाव्याला पार्श्वभूमी आहे ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची. त्यातही मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठीचा झगडा हा केंद्रबिंदू आहे. मुंबई महापालिका ही सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ७४ हजार कोटींपेक्षाही अधिक रकमेचा आहे.

म्हणजे, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, अरुणाचलप्रदेश, मेघालय, मणिपूर आणि सिक्कीम या आठ राज्यांपेक्षाही मोठा. अशा अवाढव्य मुंबई महापालिकेवर वर्चस्व राखण्यासाठी ही लढाई असल्याने ती कटोविकटीची होणार, हे ओघाने आलेच. मुंबईत भगवा फडकविण्याचे बुलंद इरादे व्यक्त करण्यासाठी चार-चार पक्ष पुढे सरसावले आहेत.

चार दशके मुंबईवर अधिराज्य गाजवल्यानंतर आता अस्तित्वासाठी हातपाय मारणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तीन वर्षात सत्तासोपानाच्या पायऱ्या दणादण चढून वर जाऊन बसलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना. शिंदे यांच्या गोटाला दाणापाणी पुरवून बलिष्ठ करण्यासाठी झटलेला ‘महाशक्तिमान’ भारतीय जनता पक्ष आणि सदैव मतदारांच्या शोधात असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

या चारही पक्षांना मुंबई पालिकेवर ‘भगवा’च फडकवायचा आहे. या चारपैकी तीन पक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खाणाखुणा करू लागले आहेत. केवळ धुपाटणे हाती उरलेल्या मनसेला अचानक हा भाव मिळावा, हे श्रेय राज ठाकरे यांचेच. त्यांच्या वैयक्तिक करिष्म्यामुळेच मनसेला पर्याय नाही, हे संभाषित तयार झाले आहे.

निवडणुकांत तरी मनसेला आजवर फारसे यश दिसलेले नाही. कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी करुन काही साध्य होणार का, याची ‘लिटमस टेस्ट’ आगामी निवडणुकीतच होईल. उद्धव आणि राज हे ठाकरेबंधू एकत्र येण्याची चर्चा तूर्त उधाणावर असली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत असला तरी राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू मात्र अद्याप कडेकडेनेच फिरत आहेत, असे दिसते.

वर्धापनदिनाच्या मेळाव्यात उद्धव यांनी राज यांना टोमणे मारले नाहीत, हाच मोठा संकेत मानला जात आहे. अगदी तसाच पवित्रा एकनाथ शिंदे यांच्याही भाषणात दिसला, आणि भाजपने तर राज यांच्याशी पंचतारांकित गुफ्तगूदेखील आरंभले. शिवसेनेत विचारांचे सोने दसऱ्याला लुटायची प्रथा आहे.

वर्धापनदिनाला एकमेकांवर तोंडसुख घेण्याची नवी प्रथा आता दोन्ही शिवसेना पक्षांमध्ये पडू पाहात आहे. खरे म्हणजे लोक या प्रकाराला कंटाळले आहेत, हे कोणीतरी या नेतेमंडळींना सांगायला हवे. दोघांच्याही भाषणात नवे असे काहीही नव्हते. ‘शब्द बापुडे केवळ वारा’ या उक्तीनुसार एक संध्याकाळ तेवढी कडवट झाली.

उरता उरल्या घड्याळ, तुताऱ्यांची डाळ मुंबईत कधी फारशी शिजलीच नाही. उर्वरित महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादी मनोमीलनाची आस अजूनही काही लोकांना आहे. मधल्या काळात महाविकास आघाडीतला हा दुसरा पक्षही फुटला, तेव्हापासून ही चर्चा कमीजास्त आवाजात सुरूच असते.

मुंबई मराठी माणसाची असली पाहिजे आणि तशीच ती राहायला हवी, या कडवट भूमिकेतून आजवर मुंबईनगरीत मतदान झाले आणि राज्यकर्तेही निवडले गेले. पण आता मुंबईवर सत्ता गाजवणारेच विजयाचा मार्ग शोधत आहेत. गेल्या तीन वर्षांत ज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्यात जनतेचा सहभाग जवळजवळ नव्हताच.

मतदारांना पूर्णत: विसरुन राजकीय गणिते मांडली गेली, आणि मोडलीही गेली.या काळात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नेत्यांचीच साठमारी होती. राज्यसभा आणि विधान परिषदेसाठीच्या निवडणुकांमध्ये तर या साठमारीचे विदारक स्वरुप बघायला मिळाले. त्याला राजकीय चातुर्यही म्हटले गेले.

एकूणच राज्यातील राजकारणाला पोकळपणा येत चालला आहे. मुंमबईत शिवसेनेच्या दोन गटांचे मेळावे आणि त्यातील भाषणे यात नेमक्या त्याच उणीवेचे दर्शन पुन्हा एकदा घडले एवढेच. येत्या चार महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतील. साहजिकच मतांची गणिते बदलतील, आणि बहुसंख्य ठिकाणी ती स्थानिक समीकरणांवरच अवलंबून असतील.

तरीही नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, हे तर खरेच.आगामी निवडणुकीत प्रश्न आहे तो ‘मुद्द्या’चा. कुठल्या मुद्द्यावर मुंबई जिंकायची? याची उठाठेव करताना मात्र एकही राजकीय पक्ष दिसत नाही. निव्वळ भाषणबाजी किंवा विचारधारांच्या बाता मारून आजकाल निवडणुका जिंकल्या जात नाहीत. त्यापेक्षा बरेच काही पणाला लागते. असे असले तरी निवडणुका पार पडेपर्यंत असाच कडवट शिमगा कळस गाठणार, हे उघड आहे. आता कुठे सुरुवात झाली आहे, एवढेच.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.