इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 471 धावांवर आटोपला. खरं तर दुसऱ्या दिवशी भारताची स्ट्राँग बॅटिंग लाईनअप पाहून ही धावसंख्या 500 पार जायला हवी होती. पण भारताच्या धावसंख्येला 471 धावांवर ब्रेक लागला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. पहिला एक तास या दोघांनी झुंज दिली आणि भारताचा डाव सावरला. कारण पहिल्या एका तासात इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. केएल राहुल बाद झाला आणि आयपीएल स्टार साई सुदर्शन मैदानात उतरला. खरं तर कर्णधार शुबमन गिलचा हा हुकूमाचा एक्का होता. मात्र पहिल्याच सामन्यात त्याने माती केली. चार चेंडूचा सामना केला आणि तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. खरं तर पहिल्याच सामन्यात चुकीचा फटका खेळताना बाद झाला. इतकंच काय तर करुण नायर आणि शार्दुल ठाकुर यांनीही निराश केलं.
करूण नायरने आठ वर्षानंतर म्हणजेच 3006 दिवसानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संघात संधी मिळाली. पण या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. सहाव्या स्थानावर खरं तर अष्टपैलू खेळाडूची संघाला गरज होती. पण त्याचा फॉर्म पाहता संधी दिली. त्यानेही या संधीचं सोनं करण्यात अपयश मिळवलं. करुण फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियावर दडपणही नव्हतं. त्यामुळे त्याला मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. पण चार चेंडूंचा सामना केला परतला. त्यालाही आपलं खातं खोलता आलं नाही.
दुसरीकडे, शार्दुल ठाकुरचंही कसोटी संघात पुनरागमन झालं. इंग्लंडमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. मात्र त्यालाही काही खास करता आलं नाही. त्यानेही 8 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून तंबूत परतला. त्यामुळे धावांची गती मंदावली. शेपटच्या फलंदाजांनी तर मैदानात हजेरी लावून परतले. इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटीत मोठी धावसंख्या करण्याची संधी गमावली आणि 471 धावांपर्यंत खिळ लागली.