Uddhav Thackeray : मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क हवा; महापालिकेत सत्ता कायम राखण्याचे आवाहन
esakal June 22, 2025 07:45 AM

मुंबई - मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी युती-आघाडीची चाचपणी सुरू केली आहे. मुंबईचे अदानीकरण चालू असून त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.

तेव्हा कोणत्याही परिस्थितीत मुंबई मराठी माणसाच्या हातून जाता कामा नये. मुंबई महापालिकेत सत्ता कायम राखायला हवी, अशी भूमिका पक्षप्रमपुख उद्घव ठाकरे यांनी आमदार, खासदारांबरोबर स्नेहभोजनात काल मांडली.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापनदिनानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरे यांनी पक्षातील आमदार, खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. रात्री झालेल्या या स्नेहभोजनावेळी सर्व आमदार, खासदारांशी ठाकरे यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. प्रत्येक आमदार, खासदाराशी वैयक्तिक संपर्क साधत त्यांनी चर्चा केली.

‘स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. त्याचप्रमाणे मुंबई महापालिका आपल्या (ठाकरे यांच्या शिवसेनेच्या) ताब्यात राहायला हवी. आज मुंबईत सर्व काही अदानीसाठी, असे सरकारचे धोरण आहे.

धारावी पुनर्वसनापासून ते अगदी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्थानकापर्यंत सर्व काही अदानींना बहाल केले जात आहे. भविष्यात हे अत्यंत धोकायदायक असून संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मिळविलेल्या मुंबईला हिसकाविण्याचा हा प्रयत्न आहे. तो हाणून पाडायला हवा,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तडजोड करण्यास तयार

मराठी माणसाची एकजूट महत्त्वाची असून मुंबई महापालिकेवरील मराठी माणसाचे वर्चस्व राखण्यासाठी कोणतीही तडजोड करण्यास आपण तयार आहोत. मनसेबरोबर युतीसाठी सकारात्मक आहोतच. त्याचबरोबर मराठी माणसाच्या एकजुटीसाठी जो पक्ष तयार असेल त्या पक्षाशी युतीसाठी तयारी उद्धव ठाकरे यांनी दाखविली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.