Kolhapur Weather Update : पावसाळ्याआधीचा मुबलक पाणीसाठा आणि मागील आठवडाभराच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीने राधानगरी धरण जून महिन्यातच साठ टक्क्याहून अधिक भरले आहे. धरणातून ३१०० क्युसेकने पाणी विसर्ग सुरू असला तरी पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक साडेचार हजार क्युसेकपर्यंत असल्याने, पाणी पातळीत दिवसागणिक एक फुटाने वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा धरण गतवर्षीपेक्षा दोन-तीन आठवडे आधीच भरण्याची शक्यता आहे. यंदा पूरस्थितीही लवकरच येईल, अशीच स्थिती सध्याच्या पाणीसाठ्याने निर्माण केली आहे.
गतवर्षी धरणात आजमितीस अवघा २६ टक्के पाणीसाठा होता. यंदा हा पाणीसाठा ३५ टक्क्यांनी अधिक आहे, तर पावसाचे प्रमाणही ३८९ मिलिमीटरने अधिक आहे. त्यातच यंदा अचानक सुरू झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने भोगावती नदीवरील १४ बंधाऱ्यांचे बरगे काढण्याचे काम लांबले. त्यातून पावसाळ्याआधीचा पाणीसाठा कमी करण्याचे नियोजन कोलमडले. पावसाळा सुरू झाल्यानंतरच धरणातून पाणी विसर्ग सुरू करावा लागला. याच काळात पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू राहिल्याने, पाणी घट होण्याऐवजी वाढच सुरू राहिली.
Kolhapur Radhanagari Rain : राधानगरीत अतिवृष्टी, सहा धरणांतून विसर्ग वाढवला; करूळ घाटात दरड कोसळली, कोल्हापुरात पावसाचा हाहाकारवीजगृहातून पाणी विसर्गाच्या पडणाऱ्या मर्यादेमुळे यंदा जून महिन्यातच पहिल्यांदा धरणाचे एक सेवाद्वार उघडून पाणी विसर्गाची वेळ आली, तरी धरणातील पाणीसाठा अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. सध्याच्या पाणीसाठ्याने पूरस्थितीची जून महिन्यातच वर्दी दिली आहे. धरणातून होणाऱ्या विसर्गापेक्षा पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची आवक वाढतच आहे.
दरम्यान, स्वयंचलित दरवाजे खुले होण्यापूर्वी आपत्कालीन दरवाजे तत्काळ सुरू करता येतील, अशी व्यवस्था या धरणाला नाही. यंदाच्या जूनमधील पाणीसाठ्याने धरणाला वक्राकार दरवाजे बसविण्याची योजना नजीकच्या काळात पूर्णत्वास येण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दरम्यान, वक्राकार दरवाजांची योजना आता प्रशासकीय मान्यतेच्या टप्प्यावर पोहोचली आहे.