India’s Mini Iran : मध्य पूर्वेत सध्या एक नवीन जिओपॉलिटिकल संकट कोसळलं आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर एअरस्ट्राईक सुरू आहे. आता या युद्धात अमेरिकाही उतरल्याने सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालं आहे. इस्रायल आणि अमेरिका एक झाल्याने इराणच्याही संतापाचा पारा चढला आहे. या युद्धाचा फटका मध्य पूर्वेलाच नाही तर संपूर्ण जगाला बसणार आहे. भारतही त्यापासून वंचित राहणार नाही. भारताची ऊर्जा सुरक्षा, परराष्ट्र धोरण म्हणजे चाबहार पोर्ट आणि मध्य पूर्वेतील अनिवासी भारतीय या सर्वांवर या युद्धाचा परिणाम होणार आहे. भारताने या दोन्ही देशातून आपल्या नागरिकांना आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं आहे. दरम्यान, हे असं असलं तरी भारत आणि इराणचे अत्यंत जवळचे संबंध राहिले आहेत. दोन्ही देशात एक प्रकारे सांस्कृतिक संबंध राहिले आहेत.
भारतातील अनेक शहरात असे समुदाय आहेत की जे अनेक शतकांपूर्वी इराणमधून आले आणि भारतातच राहिले. या समुदायांनी आपली भाषा, संस्कृती, धर्म आणि परंपरा जिवंत ठेवल्या आहेत. भारतातील काही भागांना तर आजही मिनी इराण म्हटलं जातं. भारतात कुठे कुठे हा मिनी इराण आहे त्यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. भारतात राहणाऱ्या या इराणी नागरिकांनी इतक्या वर्षानंतरही आपली संस्कृती आणि परंपरा कशी जिवंत ठेवली आहे, त्याचा आढावा घेणार आहोत.
बिहारचे किशनगंज शहर
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात 10,765 इराणी नागरिक राहतात. बिहारच्या उत्तर पूर्वेकडील किनशगंज येथे असा एक भाग आहे की त्याला भारताचा मिनी इराण म्हटलं जातं. या ठिकाणी शिराज (इराण)हून आलेल्या शिया समुदायांची वस्ती आहे. हे लोक सुमारे 500 वर्षापूर्वी म्हणजे मुघलांच्या काळात भारतात आले होते. सुरुवातीला हे लोक घोडे विकायचे. आज हे लोक टाळा, चावी, फोटो फ्रेम, चश्मा आणि किंमती खडे विकतात.
विशेष गोष्ट म्हणजे हा समुदाय फारसी भाषा बोलतो. तर सार्वजनिक जीवनात हिंदी, ऊर्दू आणि कधी कधी बंगाली भाषा बोलतात. मोहरम हा यांचा मुख्य सण आहे. पारंपारिक इराणी शैलीत इराणी लोक मुहरम साजरा करतात.
वाचा: इराण आणि इस्त्रायल युद्धादरम्यान पाकिस्तानमध्ये मोठा ब्लास्ट, नेमकं काय घडलं?
लोकसंख्या किती?
या जिल्ह्यातील या लोकांची लोकसंख्या 16,90,400 इतकी आहे. 2011च्या जनगणनेनुसार हा आकडा समोर आला आहे. मात्र, यात मुसलमानांची संख्या 11,49,095 एवढी आहे. यात शिया मुस्लिमांची लोकसंख्या महत्त्वाचा भाग आहे. हुसैनाबादच्या आसपासच्या परिसरात हे लोक अधिक राहतात. शिया मुस्लिमांचा नेमका आकडा उपलब्ध नाही. पण देशातील इतर भागातील संख्येच्या तुलनेत यांची संख्या अधिक आहे. हे मुख्यत: इराणी वंशांचे शिया मुस्लिम आहेत.
कारगिल, लडाख
कारगिलमध्ये भारतातील सर्वाधिक शिया मुस्लिम राहतात. कारगिलची संस्कृती बल्ती, फारसी आणि तिबेटी तत्त्वांचे सुंदर मिश्रण आहे. येथील लोक बल्ती भाषा बोलतात. या भाषेत फारसी आणि अरबी शब्दांचा समावेश आहे. धार्मिक उत्सवात फारसी नोहा आणि मातम, इराणई वास्तुकलेने प्रभावित इमामवाडे आणि मुहरम दरम्यान शोकगीत म्हटले जाते. कृषी आणि सरकारी नोकरी तसेच पर्यटन हा या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
मुंबईत मोठी संख्या
मुंबईत पारसी आणि शिया इराणी लोक मोठ्या संख्येने राहतात. 19-20 व्या शतकात इराणहून पारसी आणि काही शिया मुस्लिम समुदाय ब्रिटिश भारतात आले होते. मुंबईत ते स्थायिक झाले होते. या लोकांनी मुंबईत इराणी हॉटेलचा पाया रचला. आजही मुंबईत इराणी हॉटेल प्रसिद्ध आहेत. कयानी अँड कंपनी, ब्रिटानिया अँड कंपनी आदी इराणी हॉटेल प्रसिद्ध आहेत. या कॅफेत इराणी चहा, खिमा पाव, ब्रुन मस्का आदी पदार्थ मिळतात. मुंबईत इराणी समुदायात शिया मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. सध्या मुंबईत अडीच हजार इराणी लोक राहतात.
पुणे
पुण्यातही पारसी आणि इराणी समुदाय राहतो. पुण्यात कॅफे गुडलक सारख्या कॅफेमुळे इराणी संस्कृती जिवंत आहे. पारसी धर्माचे लोक अग्नि मंदिरात पूजा करतात. नवरोज सारखे उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करतात.
अलीपूर, कर्नाटक
अलीपूर हे कर्नाटकातील एक छोटसं गाव आहे. या ठिकाणी शिया मुस्लिमांची लोकसंख्या चांगलीच आहे. या ठिकाणी फारसी मातम, मुहरमचा जुलूस आणि पारंपारिक पाक शैली जिवंत ठेवण्यात आलेली आहे. अलीपूर येथील अनेक लोक आखाती देशात कार्यरत आहेत. रेमिटेन्स येथून या ठिकाणी स्थानिक अर्थव्यवस्था चालते. विवाह, भाषा आणि संस्कृतीद्वारे या लोकांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे. सध्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील गौरीबिदनपूर तालुक्यात अलीपूरचे काही मुस्लिम बहुल गावतं आहेत. या ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या 90 टक्के आहे. यात शिया मुस्लिमांची संख्या 99 टक्के आहे.