जुलै पर्यंत काश्मीरचा 'वंदे भारत' हाऊसफुल होईल
Marathi June 23, 2025 04:25 PM

सर्कल संस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमदये कटरा ते श्रीनगर दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद मिळत आहे. 7 जूनपासून सुरू झालेल्या दोन्ही फेऱ्या 25 जुलैपर्यंत जवळजवळ पूर्णपणे बुकिंग आहेत. तसेच दररोज बुकिंगची मागणी वाढत आहे. आयआरसीटीसीच्या आरक्षण पोर्टलवर 25 जुलैपर्यंत या गाड्यांमध्ये रिक्त जागा दिसतच नाहीत. त्यानंतरच्या तारखांना काही जागा दिसत असल्या तरी त्यांचे आरक्षणही वेगाने केले जात आहे. या गाड्यांमुळे खोऱ्यात प्रवास करण्याचा एक नवीन पर्याय मिळाल्यामुळे पर्यटक आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. विमानाच्या तुलनेत कमी तिकीट दरामुळे पर्यटकांकडून वंदे भारतमधून प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे.

पंतप्रधान मोदींनी 6 जून रोजी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसची तिकिटे आयआरसीटीसी वेबसाईटवरून बुक करता येतात. ट्रेनमध्ये दोन प्रवासी कक्ष आहेत. चेअर कारचे भाडे 715 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 1,320 रुपये आहे. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून 6 दिवस दोन गाड्या धावतात. या गाड्या सध्या फक्त बनिहाल येथे थांबा घेत असून इतर थांब्यांचा निर्णय अजून झालेला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.