पोलिसांच्या वेशात ५० लाख लुटणाऱ्या टोळीला बेड्या
अवघ्या सहा तासांत ठाणे, पुणे, साताऱ्यात अटकसत्र
सकाळ वृत्तसेवा ः
मुंबई, ता. २३ ः अंगडिया कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडील ५० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या सांगली येथील चार तरुणांसह पाच जणांच्या टोळीला अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकण्यात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांना यश आले.
या कारवाईत अटक आरोपींकडून चोरण्यात आलेल्या रकमेतील ३९ लाख रुपये, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार आणि हत्यार जप्त करण्यात आले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आली. अजय लोखंडे (३२), रेवणसिद्ध जावडे (२७), सागर जाधव (२९), विकास देहळे (३८) आणि दिलीप ढेकळे (४३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील दिलीप ठाण्याचा रहिवासी असून, उर्वरित चौघे सांगलीचे आहेत, असे सांगण्यात आले.
पोलिस असल्याचे भासवून धाड
२१ जून रोजी संध्याकाळी आरोपींनी भुलेश्वरच्या तिसरी पोपळवाडी येथे तक्रारदार तरुणाला रोखले. पोलिस आहोत, चौकशी करायची आहे, मुकाट्याने गाडीत बस, असे सांगत आरोपींनी त्याला स्विफ्ट डिझायर कारमध्ये कोंबले. गाडीत बसताच चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील बॅग हिसकावून घेतली. त्यात ५० लाख रुपयांची रोकड आहे, याची खात्री करून तरुणाला खारघर येथे गाडीतून बाहेर ढकलत आरोपी पुण्याच्या दिशेने निघून गेले.
असा लागला सुगावा
तक्रारदार तरुणाने तातडीने एल. टी. मार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. सोबत आरोपी, कारचे तपशील दिले. वरिष्ठ निरीक्षक नितीन तडाखे आणि पथकाने लगोलग हे तपशील पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला दिले. तोवर अन्य पथकांनी तांत्रिक तपास सुरू केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना खेड शिवापूर येथून तर पुढे निघून गेलेल्या दोन सातारा येथून, तर एका आरोपीस ठाण्याच्या शांतीनगर येथून अटक करण्यात आली.
असे निवडले लक्ष्य
भुलेश्वर भागात अंगडियांची कार्यालये असून, दररोज त्या कार्यालयातील कर्मचारी रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोच करत असतात. या टोळीने गेल्या काही दिवसांपासून या भागात ठाण मांडून तरुणावर लक्ष ठेवले होते. त्याच्या दिनक्रमाची इत्थंभूत माहिती गोळा करून २१ जून रोजी त्याला लक्ष्य केले.