शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षावर नाजारी व्यक्त केली आहे. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्या बैठकीत जाधव यांनी पक्षातील बडव्यांवर टीका केली आहे. जाधव यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मला विचारात घेतलं गेलं नाही- जाधव
भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटलं की, निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना मला विचारात घेण्यात आलं नाही. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी होती. पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले हे मला सांगण्यात आलं नाही. ते कोणी दिले? कसे दिले? याची माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. ज्या भागाची जबाबदारी आहे तिथल्या गोष्टी मला समजायला हव्यात असं जाधव यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना जाधव यांनी, पक्षातील लोक फुटून जात असताना आपल्या नेत्यांना पत्ता कसा लागत नाही? लोक पक्ष का सोडत आहेत हे समजून घ्यायला हवं, त्यांच्या व्यथा अडचणी असतील तर त्या सोडवायला हव्यात असा सल्लाही जाधव यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे.
भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी – विनायक राऊत
भास्कर जाधवांच्या नाराजीवर बोलताना विनायक राऊत यांनी म्हटले की, ‘जाधव यांची नाराजी आमच्या कानावर आलेली नाही. निवडणुकीच्या उमेदवारांबाबत उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जातो. यात इतर नेत्यांचाही सहभाग असतो. जाधव नाराज असतील तर उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतील. उद्धव ठाकरेंचा दरवाजा भास्कर जाधवांसाठी कायम खुला आहे.’
मी कधीही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो – जाधव
याआधी भास्कर जाधव यांनी बोलताना म्हटले होते की, “ला उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी कधीही अपोईटमेंट घ्यावी लागत नाही. कधीही मला गेटवर एक सेकंदही थांबवलं जात नाही. माझी गाडी पाहिल्यानंतर सर्व सुरक्षारक्षक ओळखतात. त्यावेळी एक सेकंदही न थांबता माझी गाडी थेट आत पाठवली जाते. मी माझी शिस्त पाळतो. पण मी गेटवर उभा राहतो, चेक करा म्हणून सांगतो. कारण माझ्या नेत्याची सुरक्षा व्यवस्था मलाच महत्वाची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला बोलवायला पाहिजे असं काहीही नाही. मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो.”