केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत, हा राहुल गांधी यांचा आरोप निराधार आहे. प्रत्येक निवडणूक कायद्याप्रमाणेच झालेली आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक अशा पाच महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे, ही वाढ बनावट आहे असा अर्थाचा आरोप राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात राहुल गांधी यांना पत्र पाठविले आहे. मतदारांच्या संख्येत वाजवीपेक्षा अधिक वाढ झाली आहे, हा आरोप बिनबुडाचा आहे. कारण, प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार सूचीत समाविष्ट करताना त्याची कागदपत्रे अचूकपणे तपासली जातात. त्यामुळे मतदारांची संख्या कृत्रिमरित्या वाढविणे शक्यच नसते. मतदार सूची तयार करताना असंख्य कर्मचारी आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. 1 लाखांहून अधिक मतदानकेंद्र पातळीवरच्या कर्मचाऱ्यांचा या कामात सहभाग असतो. 288 मतदार नोंदणी अधिकारी, 139 सर्वसामान्य पर्यवेक्षक, 41 पोलीस निरीक्षक, 71 खर्च अधिकारी आणि 288 मतदान केंद्र अधिकारी अशा हजारो कर्मचाऱ्यांच्या सहभागाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीच्या निर्णयांसंबंधी मोठ्या प्रमाणात न्यायालयात प्रकरणे सादर झालेली नाहीत. मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असते तर ते संबंधित राजकीय पक्षांनी निवडणूक याचिका सादर करुन न्यायालयासमोर आणलेच असते. तथापि, निवडणूक अत्यंत कायदेशीरपणे पार पडल्याने अशी संधी कोणत्याही राजकीय पक्षाला मिळालेली नाही आता निवडणूक याचिका सादर करण्याचा कालावधीही पार पडला आहे. त्यामुळे आता विनाकारण आरोप करण्यामध्ये कोणताही अर्थ नाही, अशा आशयाचे उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने गांधी यांना पाठविले आहे.