- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
Ask yourself if what you are doing today is getting you closer to where you want to be tomorrow.
- Radma Verix
अनुष्का एक मनस्वी मुलगी. कायम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार. आई-वडिलांची लाडकी आणि अर्थात नातेवाइकांमध्ये अत्यंत प्रिय. आदर्श वगैरे. तिला दहावीला ९७ टक्के गुण मिळाल्यावर काय जल्लोष....नंतर रीतसर अकरावी सायन्सला प्रवेश. पुढचा हमरस्ता ठरलेला की ठरवलेला? इंजिनिअरिंग? मेडिकल? परंतु तुपात माशी पडली.
अकरावीला कमी गुण मिळाले. ‘पुढे होईल चांगले..’ असा आशावाद सर्वांकडून व्यक्त होत होता. बारावीचे वर्ष सुरू झाले. ताणतणाव वाढतच गेला. फार पूर्वीपासून आय.आय.टी. प्रवेश परीक्षेसाठी पूर्वतयारीही सुरू होती. त्या एकट्या जिवाने काय काय करायचे ना? कडेलोट होतो. अनुष्का हल्लीहल्ली गप्प असते. अभ्यास करत नाही.
स्वतःच्या खोलीत कोंडून घेते. ताणतणावात आणखीनच भर पडते. आई-वडील अत्यंत काळजीत. परंतु लेकीवर प्रचंड विश्वास आणि प्रेमही. दोघेही परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळतात. तिच्याशी शांतपणे बोलतात. खरंच त्यां दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अनुष्का सध्या जे काय करते आहे, त्याचा वीट आलाय.
मी हे का, कशासाठी, कुणासाठी करतेय? अशा अत्यंत प्रामाणिक प्रश्नांचे काहूर तिच्या मनात माजले आहे. आई-वडिलांनी घेतलेल्या समंजस भूमिकेने कोंडी फुटली. अनुष्काला सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून पुढे आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स वगैरे व्हायचेय. तिला डिप्लोमाला प्रवेश घेऊन दिला गेला. ती आता खूष आहे.
आनंदाने अभ्यास, टर्म वर्क वगैरे पूर्ण करते आहे. वर्गात सगळ्यांच्या पुढे आहे. होईल ती आर्किटेक्ट. तिने डिप्लोमाला प्रवेश घेतला तेव्हा त्या कुटुंबावर प्रचंड बाह्य दबाव होता. कारण बारावीचे वर्ष जवळपास संपत आलेले. सर्व नातेवाइकांनी खूप समजून सांगितले. अनुष्का बधली नाही. आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्यावर तिने वेगळी नाही, परंतु स्वतःची वाट निवडली.
फार अवघड असते, हे असे काही इतरांना तऱ्हेवाईक वाटणारे वागणे. लोक काय म्हणतील? या प्रश्नाच्या जंजाळातून बाहेर पडणे तर अत्यंत क्लिष्ट. ‘अगं आयुष्यातील दोन वर्षे वाया जातील’ या प्रश्नाचा बागुलबुवा मोठ्ठा आ वासून पुढ्यात उभा असतो. पुन्हा एकदा मागे फिरायचे आणि नव्याने सुरुवात करायची. संयमाची परीक्षाच असते. अनुष्का आणि तिचे आईवडील या परीक्षेत १०० टक्के खरे उतरले आहेत. स्वयं मूल्यांकनाच्या बाबतीत अनुष्का अचूक ठरते आहे.
संशोधकांनी एकदा चित्ता आणि अनेक जातींचे कुत्रे यामध्ये धावण्याची स्पर्धा घेण्याचा प्रयोग करायचे ठरवले. पिंजऱ्याचे दार एका क्षणी उघडले. कुत्री धावत सुटली. चित्ता तसूभरही हलला नाही. तो बसून राहिला.
अनेक निष्कर्षांपैकी एक निष्कर्ष त्या संशोधकांनी असा काढला म्हणे की, चित्ता मनात म्हणाला असेल, ‘अरे हाड, मला माझी धावण्याची पात्रता माहिती आहे. मला कुणाबरोबर स्पर्धाच करायची नाहीए. मला काहीच सिद्ध करायचे नाहीए.’ अनुष्कासारख्या एखाद्या संवेदनशील व्यक्तीचे स्वतःबद्दल मत असू शकते!