Sharad Pawar : आणीबाणी लागू केली त्याला आज (25 जून) 50 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आणीबाणीच्या अनेक आठवणी ताज्या होत आहेत. आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची आठवण काढली जात आहे. खासदार शरद पवार यांनीदेखील आणीबाणीवर भाष्य केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. पण नंतर त्यांनी माफीही मागितली होती, असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसेच अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्यांनी सध्याच्या मोदी सरकारलाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं.
शरद पवार मुंबईतीत दादर येते वेगवेगळ्या कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आणीबाणीवर भाष्य केले. तसेच त्यांनी सध्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली. आणीबाणी होती. इंदिरा गांधींना दोष दिला. हे सर्व खरं. पण पराभव झाल्यावर इंदिरा गांधींनी देशाची क्षमा मागितली ही गोष्ट विसरता कामा नये. नंतरच्या काळात पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली. चित्र बदललं होतं. आज माझ्या मते पुन्हा एकदा सावध राहण्याचा काळ आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
तसेच, जे वृत्तपत्रात काम करतात, त्यांना माहीत असेल. बाकीच्यांना माहीत नाही. आज वृत्तपत्र आपलं मत स्वच्छ मांडतंय. जे वृत्तपत्र त्यांचं मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात. त्यांना सांगण्यात येतं की ही बातमी अशी छापू नका. एका प्रकारची धमकी पत्रकारांनाही दिली जात आहे, असं भाष्यही शरद पवार यांनी केलं.
पुढे बोलताना शरद पवार यांनी अघोषित आणीबाणी असा उल्लेख करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं मला प्रामाणिकपणा वाटतं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील हा दृष्टीकोण पुढे घेऊन उभे राहू, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.