खरीपाचा हंगाम संकटात
esakal June 26, 2025 01:45 AM

वाणगाव, ता. २५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शेतकरी बी-बियाण्यांच्या पेरणीत व्यस्त आहे, मात्र यंदा शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने खरिपाचा हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे.
पावसाच्या हजेरीने पेरणी, लावणी आणि कापणीची त्रिसूत्री राबवणारा शेतकरी कामाला लागला आहे. अशातच पावसाने वेळेवर हजेरी लावली असल्याने कामांना वेग आला आहे, पण जिल्ह्यातील तरुणवर्ग शेतीऐवजी शहरातील बांधकाम, कारखाने व इतर क्षेत्रांकडे वळाल्याने शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीचा वापर करावा लागत आहे, पण त्याचे दरही गगनाला भिडल्याने घरातील सदस्यांच्या मदतीने खरीप हंगामाची सुरुवात करावी लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे, पूर्वी शेतीच्या कामासाठी मजूर सहज उपलब्ध होत होते, परंतु सध्या मजुरी जास्त मिळत असल्याने अनेकांचा ओढा शहरांमध्ये कामासाठी जाण्याकडे आहे. त्याचा परिणाम मशागतीची कामे वेळेत पूर्ण करणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना कठीण झाले असून, पेरणीचे वेळापत्रक बिघडल्याने भविष्यात उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
----------------------------------------
यंत्रसामग्रीचे दर वाढले
मजुरांची कमतरता भरून काढण्यासाठी सध्या ट्रॅक्टर आणि इतर यांत्रिक साधनांचा वापर केला जातो. पण ट्रॅक्टर, रोटावेटर आणि इतर शेतीच्या अवजारांचे दर गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. ट्रॅक्टरला एक तासासाठी १००० ते १२०० रुपये भाडे आकारले जाते, तर नवीन ट्रॅक्टर घ्यायचा झाला, तर सात ते १० लाख रुपये मोजावे लागत असल्याने आर्थिक बोजा वाढला आहे.
------------------------------------------------
गटशेतीवर भर देण्याची गरज
शासन पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. काही ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटशेतीद्वारे यंत्रसामग्री सामूहिक वापरली जाते, परंतु सर्वच शेतकऱ्यांपर्यंत ही सुविधा पोहोचलेली नाही. मजुरांची टंचाई आणि यांत्रिकीकरणाचा वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.
---------------------------------
वाढीव दराने मजुरांना कामावर न्यावे लागते. शेतीच्या कामाकडे मजुरांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची गरज आहे. तसेच सरकारने यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
- संजय पाटील, शेतकरी, डहाणू

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.