चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गेले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफही चीनमध्ये आले आहेत. ऑपरेशनस सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या तणावानंतर दोन्ही नेते प्रथमच समोरासमोर आले. शंघाई परिषदेत संरक्षणमंत्र्यांची बैठक सुरु झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारत खडे बोल सुनावले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत राजनाथ सिंह यांनी ख्वाजा आसिफ यांना सुनावले.
एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पाकिस्तानीचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफसमोर राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. ते म्हणाले, आम्ही दहशतवादाविरुद्ध कारवाई करत राहू. शांतता, समृद्धी आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाहीत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णायक कृतीची आवश्यकता आहे. आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही या गोष्टींविरुद्ध लढत राहू.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, २२ एप्रिल २०२५ रोजी, ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर क्रूर हल्ला केला. यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. संयुक्त राष्ट्रांने बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाचा प्रॉक्सी असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, कोणताही देश, कितीही मोठा आणि शक्तिशाली असला तरी, एकटा कारवाई करू शकत नाही. यामुळे जागतिक व्यवस्थेत एकमेकांचा विश्वास आणि सहकार्य यावर भर दिला पाहिजे. ‘सर्वे जन सुखिनो भवन्तु’ ही भारताची जुनी म्हण आहे. त्यानुसार शांतता आणि समृद्धी याला भारत महत्व देते.
चीनमध्ये रवाना होण्यापूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारताचा दृष्टिकोन मांडणे आणि दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांचे आवाहन करण्यास मी उत्सुक आहे.