आदरणीय दादासाहेब बारामतीकर,
अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य.
शतप्रतिशत नमश्कार! तुम्ही अर्थमंत्री आहात, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या कमरेला आहेत, म्हणून तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. तुम्हाला हे माहीतच असेल की, देशभरातील विविध राज्यांमधून आणि केंद्रामधून अंदाज समित्यांचे जवळपास सहाशे सदस्य मुंबईत येऊन गेले.
अंदाज समित्यांचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत भरले होते. दोन दिवस आम्ही तुमचा पाहुणचार झोडून नुकतेच परतलो. तुम्हा सर्वांना आमचे पोटभर आशीर्वाद आहेत! महाराष्ट्र सरकारने आपली बडदास्त जबरदस्त ठेवली, यात शंका नाही. मुंबईतील ऐश्वर्य बघून माझे डोळे, जीभ आणि पोट दिपले!!
संसदीय अथवा राज्य अंदाज समिती ही अनुक्रमे केंद्र आणि राज्य सरकारांना काटकसर सुचवण्यासाठी असते. खर्चाला आळा कसा घालावा, याच्या शिफारशी करणे हे अंदाज समितीचे सदस्य म्हणून आमचे कामच आहे. पण महाराष्ट्र सरकारने केलेला खर्च बघून मी चक्रावलो. पंचतारांकित हाटेलात राहायची सोय काय, हिंडायला गाडी- ड्रायवर काय, मनोरंजनाचे कार्यक्रम काय, आणि सगळ्यात शेवटी ते सप्ततारांकित जेवण!! अहाहा, डोळे निवले!!
जेवणासाठी खास शामियाना उभारला होता. शामियाना एअरकंडिशण्ड होता, आणि लोलकांची भारी झुंबरे लटकत होती. चहुकडे मलमलचे पडदे टांगलेले होते. थोड्याच वेळात इथे मुजरा-बिजरा होणारंय की काय, असे वाटून गेले. एवढे ऐश्वर्य पाहून मला मलमलले!! मेजांवर चांदीची ताटे होती. ताटांचा साइज खूपच मोठा होता. माझ्याकडली ब्याग थोडी लहान होती. असो. चांदीचा पेलाही असाच मोठ्ठा.
ताटात मालवणी करी, सुरमई फ्राय वगैरे पदार्थ आले. तसा मी शाकाहारी आहे. कुटुंबासमवेत हाटेलात गेलो तर एक पावभाजी तिघात संपवतो. पण इथे तर सुरमई नावाचा मासा ताटात आला. मी मनात म्हटले, मासे हे थोडीच मांसाहारी असतात. त्या तर पाणशेंगा!! आपण कुठे हा मासा मारला? त्याला फक्त पाण्यातून बाहेर काढला, इतकेच. खावे!! मासा अप्रतिम होता. या माश्याला सुरमई म्हणतात, हेच मला माहीत नव्हते.
‘ही सुरमई काहीच नाही, आमचा राज्यमासा पापलेट खाऊन बघा, वेडे व्हाल!’ असे शेजारी बसलेल्या एका मराठी अंदाज समितीवाल्याने मला सांगितले. पण पापलेट हा महागडा मासा असून काटकसरीचा उपाय म्हणून सुरमईवर भागवले, असा खुलासाही त्यानेच केला. मला बरे वाटले.
‘मालवणी करी’त तिरफळे घातली होती, त्यामुळे जेवणानंतर लगेच (हात धुवायला) वॉशरुमकडे पळावे लागले. पुढल्या वेळी मालवणी करी नको, अशी शिफारस मी आत्ताच करुन ठेवत आहे. पुढल्या वेळी कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा ठेवावा.
शाकाहारी सदस्यांसाठी पुरणपोळी होती. त्यावर तुपाची फुल सिग्नेचर करण्यात येत होती. इतरही बरेच पदार्थ होते. पण या सगळ्याची किंमत साडेचार हजार रुपये आहे, हे मात्र पटले नाही. तेवढ्यात एक मराठी अधिकारी येऊन चौकशी करुन गेला.
तो चौकशी करत होता की चांदीचे काटेचमचे आणि ग्लासे मोजत होता, हे कळले नाही. साडेचार हजाराचे एक ताट आहे, असे तो जाता जाता पुटपुटला. माझा घास घशातच अडकला!! आपण जे जेवतो आहोत, ते साडेचार हजार रुपये किंमतीचे आहे, हे ऐकून मी चांदीच्या पेल्यातून तीनदा पाणी प्यायलो.
महाराष्ट्र सर्वच बाबतीत नंबर वन आहे. गुंतवणूक असो किंवा जेवण! काटकसर करुनही महाराष्ट्राला एवढी ऐश परवडते, हे बघून आनंद झाला. तुमच्या बजेटबाबतचा आमचा अंदाज चुकला!! अशीच काटकसर चालू ठेवावी. आपला तृप्त पाहुणा. गुप्ताजी.