‘पाकिस्तानात मुलेही सुरक्षित नाही…’, युनोमध्ये भारताकडून शेजारील देशाची पोलखोल
GH News June 26, 2025 02:10 PM

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मुले आणि सशस्त्र संघर्ष या विषयावर खुली चर्चा सुरु आहे. या चर्चेत पाकिस्तानने भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथानेनी हरीश यांनी पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले. दहशतवादी हल्ल्यांचा सर्वाधिक फटका मुलांना बसत आहे. पाकिस्तानात मुलेही सुरक्षित नाही. त्या ठिकाणी मुलांमधील गंभीर गुन्हेही वाढल्याचे पर्वथानेनी हरीश यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी दिलेल्या अहवालाचा उल्लेख केला.

मुलांवरील गंभीर गुन्हे वाढले

पर्वथानेनी हरीश यांनी म्हटले की, जगात सध्या संघर्ष आणि दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दुर्देवाने त्याचा सर्वाधिक फटका मुलांना बसत आहे. संयुक्त राष्ट्र महासचिवांनी दिलेल्या अहवालानुसार, सन २०२४ मध्ये मुलांवर गंभीर गुन्हे वाढले आहे. हे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये ३५ टक्क्यांनी चिंताजनक वाढ झाली आहे. हे आकडे निर्णायक कारवाई करण्याचे संकेत देत आहे. राष्ट्रीय आणि कौटुंबिक पातळीवर मुलांचे संरक्षण, पोषण आणि शिक्षण यांना प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः संघर्ष आणि संघर्षोत्तर परिस्थितीत राहणाऱ्या मुलांना मानसिक आधार आणि पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असते.

पाकिस्तानमध्ये मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन

पाकिस्तानला फटकारताना हरीश यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित टीकेला मला उत्तर देण्यास भाग पाडले आहे. पाकिस्तान स्वतः सीएएसी अजेंड्याचे गंभीर उल्लंघन करणारा देश आहे. वारंवार अनावश्यक प्रश्न उपस्थित करून भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानातील मुलांवर होणारे अत्याचार आणि सीमेवरील दहशतवादाकडील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुन भारताला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याचे आम्ही निषेध करतो.

संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या अहवालाचा हवाला देत पर्वथानेनी हरीश म्हणाले की, पाकिस्तानमध्ये मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन होत आहे. पाकिस्तानला इतरांना दोष देण्याचा नैतिक अधिकार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.