७ मे रोजीचे ‘ऑपरेशन सिंदूर’ झाल्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पहिल्यांदा शांघाय सहयोग संघटन ( SCO ) शिखर संमेलनात सामील होण्यासाठी चीनला गेले होते. या दौऱ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या भूमीवरुन दहशतवाद विरोधात भारताची असलेली भूमिका जोरदारपणे मांडली. ज्यावेळी दहशतवादावरुन पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना राजनाथ सिंह यांनी खडे बोल सुनावले तेव्हा दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री एकाच व्यासपीठावर समोरासमोर बसले होते.
भारताने दहशतवादावर केवळ कठोर संदेशच दिला नाही तर पाकिस्तान आणि चीनच्या वतीने संयुक्त घोषणा पत्रात दहशतवादाच्या मुद्दयाला कमजोर करण्याच्या प्रयत्नांना देखील नाकाम केले. या बैठकीत संयुक्त घोषणा पत्राचा मसुदा तयार केला होता, परंतू त्यात पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केलेला नव्हता. याउलट पाकिस्तानच्या मागणीवरुन बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. या मसुद्यावर राजनाथ सिंह यांनी हस्तांक्षर करण्यास साफ नकार दिला. चला तर पाहूया कोणता मुद्दा या मसुद्यात पाकिस्तान जबरदस्ती खेचून आणू पाहत होता. कोणत्या ट्रेनवरुन पाकिस्तानचे संरक्षण मंत्री भारतासमोर फसले, आणि त्यांच्या इराद्यांवर पाणी फेरले…
आधी जाणूयात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एससीओ मिटींग मध्ये काय म्हटले ? त्यांनी म्हटले की,’ २ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये अतिरेकी संघटना रेजिस्टेंस फ्रंटने निष्पाप पर्यटकांवर नृशंस हल्ला केला. हा हल्ला भारताच्या जम्मू-काश्मीर राज्यात केला गेला. एक नेपाळी पर्यटकासह एकूण 26 पर्यटकांना ठार मारले होते. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन ठार केले गेले.रेजिस्टेंस फ्रंट लष्कर-ए- तैयबाची प्रॉक्सी अतिरेकी संघटना आहे. या संघटनेने या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ‘
ते म्हणाले की पहलगामचा अतिरेकी हल्ल्याची पद्धत भारतात यापूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्या सारखीच होती. भारताने या हल्ल्यानंतर आपल्या अधिकाराचा वापर करीत ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदुर राबवून सीमेपलिकडील अतिरेक्यांची पायाभूत सुविधा संपवून टाकली. ते म्हणाले की शांतता आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही. दहशतवादा संदर्भात दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही. काही देश दहशतवादाला आपले धोरण बनवत चालले आहे. कट्टरता आणि दहशतवाद आज सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करणे गरजेचे आहे. SCO ना दहशतवादा विरोधात कठोर भूमिका घेतली पाहीजे असे राजनाथ सिंह यांनी निक्षून सांगितले तेव्हा पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ मान खाली घालून ऐकत राहीले.
एससीओ बैठकीत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की आमची सर्व देशांना विनंती आहे की त्या देशांना जाब विचारावा ज्यांनी बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवर अतिरेकी हल्ल्याची योजना तडीस नेली. तिला पैसा पुरवला आणि प्रायोजकत्व पुरवल. ख्वाजा आसिफ यांनी कोणत्या देशाचे नाव घेतले नाही. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ही घटना विनाकारण यात बैठकीत खेचून आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संयुक्त निवेदनात सहमती न बनता त्यांना तोंडावर आपटावे लागले.
११ मार्च २०२५ रोजी, बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले. ट्रेनमध्ये किमान ३८० प्रवासी होते. क्वेट्टापासून सुमारे १६० किलोमीटर (१०० मैल) अंतरावर असलेल्या सिबी शहराजवळील बोगद्यांमधून ही ट्रेन जात असताना हल्ला करण्यात आला. BLA च्या जवानांनी ट्रेनवर गोळीबार केला आणि रेल्वे रुळ उडवले, ज्यामुळे ट्रेन डोंगराळ भागात थांबली. पाकच्या सुरक्षा दलांना या भागात पोहोचणे कठीण झाले. पाकिस्तानी सैन्याची BLA सोबत चकमक झाली आणि लष्करी कारवाई संपेपर्यंत ३४६ प्रवाशांना वाचवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.