पाकिस्तान आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने भारताविरोधात मोठा कट रचायला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान दहशतवादी तळांवर हल्ला करत ती उध्वस्त केली होती, मात्र आता पाकिस्तान उध्वस्त झालेली दहशतवाद्यांची लाँचिंग पॅड आणि प्रशिक्षण केंद्रे पुन्हा बांधत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय, पाकिस्तानी सरकार आणि लष्कर दहशतवाद्यांना थेट पाठिंबा देत आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे पुन्हा बांधण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीला जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनांचे मुख्य कमांडर व पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे अधिकारी हजर होते.
हाय-टेक प्रशिक्षण केंद्र तयार केली जाणार
नव्याने बांधली जाणारी प्रशिक्षण केंद्र ही हायटेक असणार आहेत. तसेच या केंद्रांची सुरक्षा पाकिस्तानी लष्कराकडे असणार आहे. ड्रोन, थर्मल सेन्सर्स, नाईट व्हिजन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या केंद्रांवर नजर ठेवली जाणार असल्याचेही समोर आले आहे.
खास रणनीती
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनांनी रणनीती बदलली असल्याचे बोलले जात आहे. आता 200 पेक्षा जास्त दहशतवादी एकाच छावणीत राहणार नाहीत. आता अनेक लहान छावण्या बांधण्याची योजना आहे. ज्यामुळे भारतीय एजन्सींना या भागात पोहोचणे अवघड होईल. तसेच दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ताबडतोब सीमेवर पाठवले जाणार आहे.
लाँच पॅड पुन्हा तयार होणार
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड उडवले होते. यात लुनी, पुटवाल, भैरोनाथ, पीपी धंधार, टिपू, मुमताज कॉम्प्लेक्स, जमील, सैधवाली, उमरानवाली बंकर, चपरार फॉरवर्ड, छोटा चक पोस्ट, अफजल शहीद पोस्ट आणि जंगलोरा पोस्ट यांचा समावेश होता. आता सर्व ठिकाणी पुन्हा नवीन लाँच पॅड तयार केले जाणार आहेत.
सरकारचा पाठिंबा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला जात आहे. हा भारतासाठी आगामी काळात मोठा धोका आहे. त्यामुळे भारतानेही दक्षता वाढवली आहे. सैन्य आणि गुप्तचर संस्थांनी हाय अलर्ट जारी केला आहे.