MNS Morcha : हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध म्हणून मनसेने येत्या 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये समस्त मराठी माणसांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावे म्हणून मुंबई लोकमध्येही पत्रकं वाटली जात आहेत. दरम्यान, आता याच मोर्चासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. येत्या रविवारी म्हणजेच 29 जुलै रोजी मनसेकडून एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 29 जुलै रोजीच शाखाप्रमुखांना महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत.
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या (29 जून) बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता मुंबईतील राजगड या मनसे पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित असतील.
दुसरीकडे कल्याणमध्ये हिंदी सक्तीविरोधात ठाकरे गट व मनसे एकत्र आले आहेत. उद्या (29 जून) कल्याणमध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे बाळा परब आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वात उद्याच्या आंदोलनाच्या तयारीसाठी कल्याण शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधी डोंबिवलीत पलावा पुलप्रश्नीही ठाकरे व मनसे दोघे पक्ष एकत्र आले होते. या बैठकीत उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी तीन वाजता हिंदी सक्तीबाबतच्या शासनाच्या परिपत्रकाची होळी करत करणार आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी हिंदी सक्तीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा बंधूंमध्ये निर्माण होत असलेल्या जवळीकीचे विवेचन केले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि दोन्ही ठाकरे एकत्र झाले तर ते एक शक्ती आहेत. हे अनेकांच्या मनात होते परंतु प्रत्यक्षात घडत नव्हते. आता हिंदीच्या निमित्ताने का होईना पण ते एकत्र येत आहेत, ही दोन कारणांसाठी मोठी गोष्ट आहे, असे मत संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रामध्ये सध्या सक्षम विरोधी पक्ष असण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर विरोधी पक्षाचे बळ एकवटेल. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस जशी मुंबई वाचवण्याचा प्रयत्न केला गेला त्याप्रमाणे मुंबई अडचणीत आहे. केवळ भाषिक प्रश्नामुळे नव्हे तर मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ते वाचली पाहिजे, असे थेट मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.
तसेच, मुंबई काही साधी गोष्ट नाही. बृहन्मुंबईमध्ये आज आठ महानगरपालिका, 61 विधानसभा मतदारसंघ आहेत. या भागावर उत्तर भारतीयांनी वर्चस्व केले तर आपल्या महाराष्ट्राच्या हातातून ही मुंबई निघून जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई वाचवण्याचा अजेंडा घडू शकतो असे लोकांना वाटते. हिंदी हे निमित्त आहे. परंतु कुठल्या का निमित्ताने का होईना दोन्ही पक्ष एकत्र येतील. युती म्हणून ते एकत्र येतील पण विलणीकरण होणार नाही. हे दोन्ही पक्ष समांतर चालतील.हे दोघे बंधू एकत्र आल्यास मुंबईमध्ये एक ताकद तयार होईल, असे विश्लेषण उन्हाळे यांनी व्यक्त केले.
मुंबईमध्ये संकट घोंगावतंय. या ठिकाणचे डायमंड मार्केट शिफ्ट झाले. उत्तर भारतीय लोक म्हणतात की मुंबईची सत्ता पालिका आमच्या ताब्यात येईल. अशी भाषा जेव्हा येते तेव्हा मला वाटते मराठी अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो. हिंदी भाषेचा जीआर रद्द करण्याची वेळ आली ते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, असे मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.