कोळोसे गावात बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक
कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महाड, ता. २८ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी गावागावांत जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न मोहोप्रे-आचळोली कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी कोळोसे गावातील शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोली येथील कृषिदूत रामचंद्र ठणके, रोहन चव्हाण, विपुल हगवणे, प्रतीक जाधव, युवराज सूर्यवंशी, गौरव विश्वकर्मा, मानव पाटील, समीर न्हावेलकर या कृषिदूतांनी बीज प्रक्रिया कशी व का करावी, यासंदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर बियाण्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया कशी उपयोगी आहे, हे पटवून सांगितले. त्या वेळी शेतकऱ्यांना रासायनिक व जैविक खतासह बीज प्रक्रिया करून दाखवली. शेतकरी या प्रात्यक्षिकांचा अवलंब करून शेतामध्ये उत्तम प्रकारचे व निरोगी बियाणे तयार करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या वेळी कोळोसे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय मोहोप्रे-आचळोलीचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका व्ही. आर. पवार, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. एस. संकपाळ, विषयतज्ज्ञ व्ही. ए. घुले व एस. एफ. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक प्रक्रिया करण्यात आली.
कृषिकन्या नाते गावात दाखल
महाड (बातमीदार) : गावातील प्रत्येक व्यक्तीची नाळ शेतीशी जुळली जावी, या उद्देशाने मोहोप्रेतील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी नाते गावाला भेट दिली. स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रात्यक्षिके दाखवली, तसेच क्षयमुक्त ग्रामपंचायतीचा नारा दिला. या वेळी सरपंच युवराज पोवळे, उपसरपंच समीर पाथरे, तलाठी सूरज पुरोहित, ग्रामसेवक सुवर्णा उंबरसडा, पोलिस पाटील सुरेश महाकाल, शिपाई मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पुढील १२ आठवडे या कृषिकन्या नाते गावामध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रात्यक्षिकांबरोबरच शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन, रानभाज्या प्रदर्शन व शेतीसंबंधी व्याख्याने आदी उपक्रम राबवणार आहेत.
महाड ः नाते गावात कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.