मनातून साकारलेला 'मनसंवाद'
esakal June 29, 2025 09:45 AM

प्रा. विश्वास वसेकर- editor@esakal.com

डॉ. राजेंद्र माने हे प्रथितयश लेखक असून कथा-कादंबरीच्या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. नुकताच चपराक प्रकाशनने प्रसिद्ध केलेला त्यांचा ‘मनापासून’ हा ललितगद्याचा संग्रह हाती आला आणि हा वाङ्मयप्रकार ते उत्तमपणे हाताळू शकतात, हे सिद्ध झाले. एकाहून एक सरस असे ललितलेख यात आहेत.

‘चैतन्याचा वसा’ या लेखात कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या गावी स्मारक कसे उभे राहिले याचा ललितरम्य वृत्तान्त येतो. सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर मर्ढेकरांचे गाव आहे. अलीकडे तेथे कृष्णाकाठावर घाट बांधला आहे. मर्ढेकरांचे तिथले वास्तव्य कसे असेल याचे सुंदर कल्पनातरंग लेखक दाखवितात. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी स्मारकासाठी पुढाकार घेतला. तसेच हिराबाई निकम यांनी आतापर्यंत ही वास्तू सांभाळली. या दोघांबद्दल कृतज्ञतेची भावना प्रस्तुत लेखात व्यक्त झाली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरचा लेखही सुरेख झाला आहे. एका निवृत्त आणि वयोवृद्ध संगीतकाराची खुशाली विचारता त्यांनी त्यांचं आयुष्य हे ‘भूप रागासारखं चाललंय’ असं विधान केले. दीदींना ते कळले म्हणून त्यांनी पर्समध्ये होत्या त्या सगळ्या नोटा त्यांच्या हातात कोंबल्या. भूप रागासारखं म्हणजे काय ते पुढे लेखकानं समजून सांगितले नसते तर संगीत न कळणाराला ते मुळी कळलेच नसते.

‘बांधकाम समजुतीच्या पुलाचे’ हा एक नितांतसुंदर लेख आहे. लेखाच्या सुरुवातीला शेतावरून भांडणाऱ्या भावाचे वागणे मनाला लावून घेणाऱ्या गृहस्थाला लेखक छान समजावून सांगतात. त्याने त्याच्यात आमूलाग्र परिवर्तन घडते आणि त्याचे जीवन सुंदर होते. जग हे मुळात सुख आणि आनंदाने भरलेले आहेत. ज्या काही समस्या आणि दुःख आहेत ती बव्हंश मानवनिर्मितच आहेत. ‘आदमी’चा जर का इन्सान होऊ शकला तर दुःख उरते कुठे?

‘काळा गुलाब’ या लेखाचा शेवट सातारा जिल्ह्यातील वेडगळ माणसांसाठी काम करणाऱ्या रवी बोडके आणि त्यांच्या ‘यशोधन’ संस्थेने होतो. ‘कोतमिरीची म्हातारी’ हे एक जिवंत, बोलके व्यक्तिचित्र आहे. कोतमिरीची म्हातारी म्हणजे कोथिंबीर विकणारी म्हातारी. तिच्या बोलण्यात सदैव जुन्या म्हणी आणि वाक्प्रचार असायचे. त्यांचा समायोचित आणि अर्थपूर्ण वापर म्हातारी कशी करावयाची याचे किस्से रंजक आहेत. ते मुळातून वाचायला हवेत.

तुळशीचे लग्न आणि तुम्ही-आम्ही’, ‘लोकमहाभारतातून’ आणि ‘कृष्ण-द्रौपदी नातेबंध’ या तीन लेखांचा एकत्रित विचार करायला हवा. रामायण, महाभारत ही आर्ष महाकाव्ये आपला मोठा सांस्कृतिक वारसा आहेत, याचे भान डॉ. माने यांना सदैव आहे. ‘कृष्ण-द्रौपदी नातेबंध’ हा लेख मला विशेष महत्त्वाचा वाटतो. या मुलखावेगळ्या नात्याविषयी धीटपणाने लिहिण्याचे धाडस पूर्वी श्री. के. क्षीरसागर आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांनी दाखवले आहे. दुर्योधनाने द्रौपदीला घाणेरडे चिडवले आणि ती निरुत्तर झाली. त्यावर कृष्णाने द्रौपदीला दुर्योधनाची पत्नी भानुमतीच्या बाबतीतील प्रसंग सांगून दुर्योधनाला गप्प बसवण्याचा जो उपाय सांगितला, तो थक्क करणारा आहे. लेखकाचे संपन्न वाचनाचे मनोज्ञ दर्शन इथे घडते.

‘राम म्हणू राम’ या लेखात रावणाने रामाच्या शिवपूजेत पौरोहित्य केले इतकेच नाही तर तेवढ्यापुरते मेघनादाला सांगून सीतेलाही अशोकवनातून आणवले, हा प्रसंग लेखकाने फार सुंदर रंगविला आहे. अंकुश रामायणातला हा प्रसंग माझ्याप्रमाणेच अनेक वाचकांना पूर्वी माहीत नसलेला असेल अशी मला खात्री आहे. हे लेखकाचे नवेपण आणि वेगळेपण आहे.

‘झुंड’ या लेखात चार वर्षाच्या एका मुलीला चारपाच कुत्रे चावा घेत आहेत, जिवाच्या आकांताने ती ओरडत आहे आणि तिला वाचवण्याऐवजी या (दुर्मीळ?) प्रसंगाचे व्हिडिओ माणसं काढताहेत. या अनुभवाने लेखक अस्वस्थ होतो. मोबाइल समृद्धी समाजाला कुठे नेतेय या विचाराने आपणही अस्वस्थ होतो. झुंडीचे मानसशास्त्र हे विश्वास पाटील यांचे पुस्तक लेखकाने वाचले असावे. त्याचा इथे संदर्भ लेखकाला प्रस्थापित करता आलेला नाही. याला जोडून ‘गुगल विद्यापीठाचे मानकरी’ हा लेख वाचायला हवा. गुगलच्या वापराच्या बाबतीत सुवर्णमध्य कसा साधायचा हे लेखक इथे सांगतात. यातून लेखकाची सामाजिक बांधिलकी सूचित होते.

JSW Steel Plant: ‘जेएसडब्ल्यू’ ला देऊ नका सुपीक जमीन; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे,प्रशासन शोधणार पर्यायी जागा

डॉ. राजेंद्र माने एकाहून एक सुंदर व्यक्तिचित्र लिहू शकतात याचे पुरावे या पुस्तकात आहेत. आत्तार गुरुजी( पृ. ६५), भागी (पृ. ६८), फौजी (पृ. १२) ही विखुरलेली व्यक्तिचित्रे आपल्या मनात रुमझुमत राहतात. शिवाय या संपूर्ण पुस्तकात लेखकाची आजी आणि डॉ. आ. ह. साळुंके वारंवार भेटतात. या दोघांचा लेखकाचा संवेदनस्वभाव घडवण्यात महत्त्वाचा वाटा आहे. डॉ. आ. ह. साळुंके केवळ सातारचे नाही तर अखिल महाराष्ट्राचे दैवत आहे. साताऱ्यातील वास्तव्यामुळे साळुंके सरांचा जो सहवास डॉ. मानेंना लाभला त्याचा हेवा वाटतो. एकंदरीने असे म्हणता येईल, की हे शहाणीवेचे ललितगद्य आहे. लेखकाचे समृद्ध व्यक्तिमत्त्व, वाचनाने त्याला आलेली परिपक्वता, उर्दूचा अभ्यास, डॉक्टर असणे या सर्वांचे मनोज्ञ दर्शन या लेखांतून घडते. हे पुस्तक वाचताना जगणे कसे सुंदर करता येईल याची शहाणीवेची जाणीव हे लेख करून देतात. अंतरीचे धावे या संतश्रेष्ठ तुकारामांच्या उक्तीप्रमाणे ते आतून, उत्स्फूर्तपणे आणि अकृत्रिमपणे लिहिलेले असल्यामुळे ‘मनापासून’ हे पुस्तकाचे शीर्षकही अन्वर्थक वाटते. त्याचबरोबर वाचकांना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्या मनाशी संवाद साधण्याची कला लेखकाला इथे नेमकेपणाने साधलेली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.