पुणे : येरवडा येथील समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे विश्रांतवाडी येथे अचानक स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘हा निर्णय अन्यायकारक असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी थट्टा करणारा आहे,’’ अशा तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, शनिवारी (ता. २८) विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील जेवणावर सामूहिक बहिष्कार घालत निषेध नोंदविला. येरवडा वसतिगृहात अभ्यासासाठी अनेक मूलभूत सुविधा आहेत. ज्यामध्ये अभ्यासिका, बाग, ग्रंथालय, सुसज्ज जीम उपलब्ध आहे.
नवीन वसतिगृहात या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच स्थलांतर केले जाईल, असे काही महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, सद्यःस्थितीत विश्रांतवाडी येथील वसतिगृहात कोणत्याही प्रकारची सोय नाही. या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी रविवारी (ता. २९) शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ‘‘या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढणार आहे. बुधवारी (ता. २५) रात्री झालेल्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांना कोणतेही स्पष्टीकरण न देता वसतिगृह रविवारपर्यंत (ता. २९) रिकामे करावे लागेल, असे सांगण्यात आले. यासंदर्भात आम्ही वारंवार गृहप्रमुख आणि गृहपाल यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले.’’ यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
या अडचणींचा सामना करावा लागणार...
अभ्यासासाठी लागणाऱ्या सुविधा कमी
प्रवासाचा खर्च व वेळ वाढल्याने आर्थिक व मानसिक त्रास
अभ्यासिका, ग्रंथालय, जीम, बाग यांसारख्या सुविधांचा अभाव
नवीन परिसरात असुरक्षित वातावरण
जेवणाचा दर्जा व वेळ व्यवस्थापनात अडचण
येरवड्याच्या वसतिगृहात अभ्यासासाठी शांतता, सुविधा आणि वेळ मिळतो. आता ते विश्रांतवाडीला स्थलांतरित केलं तर प्रवासात वेळ जाईल. त्यामुळे हे स्थलांतर थांबवावे, ही विनंती.
- एक विद्यार्थी
India Womens Hockey : प्रो हॉकीत भारताचा सलग सातवा पराभवइथे अभ्यासासाठी शांत वातावरण, वाहतुकीची सोय आणि सुरक्षित परिसर आहे. चार दिवसांत स्थलांतराचा आदेश म्हणजे आमच्या शिक्षणावर आघात आहे.
- एक विद्यार्थी